
मुंबई-गोवा महामार्गाची पालकमंत्री भरत गोगावले यांच्याकडून पाहणी चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी अडचणींच्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करा*
रायगड, प्रतिनिधी) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास चाकरमान्यांसाठी सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी महामार्गावरील खड्डे आणि इतर अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना पालकमंत्री भरत गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
महामार्गावरील अडचणींची केवळ कार्यालयीन माहिती न घेता प्रत्यक्ष पाहणी करून त्याच ठिकाणी उपाययोजनांबाबत निर्देश त्यांनी यावेळी दिले.
पनवेल-पळस्पे येथून मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यास पालकमंत्री श्री. गोगावले यांनी प्रारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, प्रांताधिकारी प्रविण पवार तसेच राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम आणि जिल्ह्यातील संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. गोगावले म्हणाले की, ज्या-ज्या ठिकाणी अडचण दिसत आहे, त्या ठिकाणी थांबून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे. एका ठिकाणी सुरू असलेले काम पुढील तीन-चार दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग कमी होऊन पुढे वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे खड्डे आणि रस्त्याशी संबंधित अडचणी राहता कामा नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी वेगाने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
*गणेशोत्सवातील वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य*
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी ये-जा करतात. रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर भागांकडे जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुरळीत व्हावा, ही प्रमुख जबाबदारी लक्षात घेऊन महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे. महामार्गावरील प्रत्येक अडचणीच्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करून वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, असेही पालकमंत्री श्री. गोगावले म्हणाले. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठकही घेण्यात आली असून, त्यानंतर सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत माणगावपर्यंत महामार्गाची पाहणी करण्यात येत आहे. या मार्गावरील अडचणींची प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
*वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांचे कौतुक* गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असते. वादविवाद, गर्दी आणि वाहतूक कोंडी अशा विविध परिस्थितींमध्ये पोलीस दलाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे पालकमंत्री श्री. गोगावले यांनी कौतुक केले. काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे योग्य वेळी कौतुक करणे गरजेचे आहे, असे सांगत रायगड पोलिसांच्या कार्याचे त्यांनी अभिनंदन केले.
*******



