कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी चालत जाणा-या भाविकांसाठी मराठी, तेलगु आणि कन्नड भाषेमध्ये शासकीय योजंनाची माहिती देणाऱ्या मल्टिमीडिया प्रदर्शनाचे आयोजन
कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी चालत जाणा-या भाविकांसाठी मराठी, तेलगु आणि कन्नड भाषेमध्ये शासकीय योजंनाची माहिती देणाऱ्या मल्टिमीडिया प्रदर्शनाचे आयोजन तामलवाडी टोल प्लाजा येथे 11 वर्षे सेवा सुशासन आणि गरीब कल्याण विषयांवरील डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन
राज्य प्रतिनिधी-अश्विन अर्थात कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी चालत जाणा-या भाविकांनी मल्टिमीडिया प्रदर्शनाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजंनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस उप अधीक्षक डॉ. निलेश देशमुख यांनी केले.
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, सोलापूर; जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा पोलीस प्रशासन, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोल प्लाझा येथे 11 वर्षे सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या विषयावर आयोजित केलेल्या दोन दिवसीय डिजिटल मल्टिमिडीया प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. देशमुख बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे देखील उपस्थित होते. केंद्र व राज्य शासनाच्या पंतप्रधान आवास योजना, जल जीवन मिशन, महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्मान भारत सारख्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरीब व मध्यम कुटुंबातील लोकांचे जीवनमान उंचावले आहे. तसेच देशामध्ये विविध पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या विकासकामामुळे नागरिकांचे आयुष्य आरामदायी व सुखकर होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मजबूत व कणखर निर्णय तसेच विदेश नीतीमुळे भारताचे नाव संपूर्ण जगामध्ये गाजत आहे, असे यावेळी खडसे यांनी सांगितले.
अश्विन पौर्णिमेनिमित्त आई तुळजाभवानी देवीचा निघणारा छबिना पाहण्यासाठी व दर्शनासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना तसेच महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातून येणाऱ्या बहुभाषिक भाविकांना केंद्रीय योजनांची माहिती मिळावी, यासाठी केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने भव्य एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून मराठी, तेलगु व कन्नड भाषेतून माहिती उपलब्ध केली आहे, असे क्षेत्रिय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी सांगितले; तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली भारताने मागील 11 वर्षात विविध क्षेत्रात केलेली कामगिरी, देशात जलदगतीने होत असलेली विकासकामे आणि धोरणांची माहिती यासह विकसित भारताच्या अमृत काळामध्ये घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहे, असेही यादव यांनी सांगितले.
प्रदर्शन दिनांक 6 ऑक्टोबरपर्यंत 24 तास सर्वांसाठी विनामूल्य आहे. प्रदर्शनातील चित्रे व मजकूर डिजिटल एलईडी स्क्रीनमध्ये असल्याने रात्रीच्या वेळी पाहण्याचे विशेष आकर्षण आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भाविकांना अल्पोपहार देण्यात आला. सांगोला येथील जय भवानी कलापथकाचे शाहीर सुभाष गोरे व त्यांच्या सहकारी कलावंतांनी पोवाड्याच्या माध्यमातून केंद्रीय योजनांची माहिती देऊन भाविकांचे प्रबोधन केले.