vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ गुणवंत शिक्षकांचा सन्मान देशभरातील ८२ शिक्षक सन्मानित

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ गुणवंत शिक्षकांचा सन्मान देशभरातील ८२ शिक्षक सन्मानित

नवी दिल्ली, प्रतिनिधी: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन, संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील ९ गुणवंत शिक्षकांचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ ने गौरव करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे आज वितरण करण्यात आले.केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि उच्च शिक्षण विभाग तसेच कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. देशभरातील ४८ शालेय शिक्षक, २१ उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आणि १३ कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षक, अशा एकूण ८२ शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, पदक आणि ५० हजार रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजूमदार, कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी, शिक्षण मंत्रालयाचे सचिव अनिल कुमार, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या सचिव देबाश्री मुखर्जी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिक्षकांचा सन्मान हाच प्रगत समाजाचा पाया

पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाहीत, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला, चारित्र्याला आणि विचारांना आकार देऊन सशक्त राष्ट्राची पायाभरणी करतात, असे त्यांनी सांगितले.डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीस अभिवादन करताना राष्ट्रपतींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रवींद्रनाथ टागोर आणि गोपाळबंधू दास यांच्या शैक्षणिक योगदानाचा विशेष उल्लेख केला. अंदमान-निकोबारपासून लडाखपर्यंत दुर्गम आणि ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या समर्पणाचे त्यांनी कौतुक केले.भारताला जगाची ज्ञान आणि कौशल्याची राजधानी बनविण्यासाठी प्राथमिक स्तरापासूनच तंत्रज्ञान, नैतिक मूल्ये आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहनही राष्ट्रपतींनी केले.

महाराष्ट्रातील ९ गुणवंत शिक्षकांचे उल्लेखनीय कार्य,शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास या तीनही क्षेत्रांत महाराष्ट्रातील या शिक्षकांनी आपल्या कार्यातून शिक्षणाच्या गुणवत्तेला नवी दिशा देतानाच वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना, संशोधन आणि रोजगाराभिमुख कौशल्यनिर्मिती यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

शालेय शिक्षण क्षेत्र,डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे – साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय, बीड

बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या २९ वर्षांपासून डॉ. कविता गिट्टे यांनी अथक कार्य केले आहे. प्रतिकूल सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी ‘पालक रक्षक’ आणि ‘शिक्षण आपल्या दारी’ यांसारखे अभिनव उपक्रम राबवले. ऊसतोड छावण्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून हजारो मुलांना शिक्षणाशी जोडण्याबरोबरच त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी आणि उच्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले.

कुंदा जयवंत बच्छाव – महापालिका शाळा, नाशिक,नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी कुंदा बच्छाव यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी यंत्रमानव तंत्रज्ञान, सहाय्यक तंत्रज्ञान आणि डिजिटल अध्यापन पद्धतींचा प्रभावी वापर सुरू केला. वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडत त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले.

वैभव वसंतराव कुलकर्णी – जवाहर नवोदय विद्यालय, लातूर,गणित विषयाची विद्यार्थ्यांमधील भीती दूर करून तो अधिक सोपा आणि आनंददायी करण्यासाठी वैभव कुलकर्णी यांनी खेळणी व कलांच्या माध्यमातून गणित शिकविण्याची अभिनव पद्धत विकसित केली. दैनंदिन जीवनातील उदाहरणे, खेळणी आणि कलांचा वापर करून त्यांनी कठीण गणिती संकल्पना विद्यार्थ्यांना सहज समजावून दिल्या. त्यांनी विकसित केलेले गणितीय शैक्षणिक साहित्य राज्यासह देशपातळीवर वापरले जात आहे.

शिवप्रसाद अरविंद टिंगरे – सैनिक स्कूल, सातारा,विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी श्री. शिवप्रसाद टिंगरे यांनी प्रत्यक्ष प्रयोगांवर आधारित विज्ञान शिक्षण, कमी खर्चातील प्रयोगसाधने आणि परस्परसंवादी डिजिटल अध्यापनाचा प्रभावी वापर केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक नवोपक्रम पुरस्कार तसेच जपानमधील आंतरराष्ट्रीय विज्ञान उपक्रमात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

उच्च शिक्षण क्षेत्र,डॉ. विक्रम विशाल – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईभारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या भूविज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विक्रम विशाल हे संगणकीय आणि प्रायोगिक भूयांत्रिकी संशोधन गटाचे नेतृत्व करतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने कार्बन पकड व साठवणूक तसेच अपारंपरिक हायड्रोकार्बन प्रणालींवर त्यांनी उल्लेखनीय संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनामुळे पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत ऊर्जा क्षेत्राला महत्त्वपूर्ण योगदान मिळत आहे.

डॉ. अमर मोहनराव ताकसांडे – जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, दत्ता मेघे संस्था, वर्धाबालरोग विभागाचे प्रमुख म्हणून डॉ. अमर ताकसांडे यांनी वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि ग्रामीण बालआरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. वैद्यकीय शिक्षण अधिक सुलभ आणि परिणामकारक करण्यासोबतच ग्रामीण भागातील बालकांना सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष कार्य केले आहे.

डॉ. संदीपान प्रल्हाद नरोटे – शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूरइलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार क्षेत्रातील प्रतिमा प्रक्रिया आणि जैवमिती या विषयांमध्ये डॉ. संदीपान नरोटे यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. तंत्रनिकेतनातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि बदलत्या औद्योगिक गरजांनुसार त्यांची क्षमता विकसित व्हावी यासाठी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला.

कौशल्य विकास व उद्योजकता क्षेत्रकिरण प्रकाश झारकर – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव,पारंपरिक शिक्षणपद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत श्री. किरण झारकर यांनी धाराशिव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रभावी शिक्षण परिसंस्था विकसित केली. डिजिटल माध्यमे, संगणकाधारित शिक्षण आणि प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण यांची सांगड घालत विद्यार्थ्यांना उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासह रोजगारक्षमतेलाही मोठी चालना मिळाली आहे.

अर्चना राकेश जाधव – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्र्यंबकेश्वर, नाशिकआदिवासी आणि दुर्गम भागातील युवतींना कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी करण्यासाठी श्रीमती अर्चना जाधव यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. वस्त्र व फॅशन रचना तंत्रज्ञान विभागात प्रशिक्षण देताना त्यांनी ग्रामीण आणि आदिवासी युवतींना आधुनिक वस्त्ररचना, शिवणकाम आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित कौशल्यांचे दर्जेदार प्रशिक्षण दिले. या माध्यमातून अनेक युवतींना स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

 

०००

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बसेसची संख्या वाढवावी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक· परिवहन सेवा सक्षम करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील वादळी वाऱ्यांचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

आज 19 ऑगस्ट रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी…

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

उद्योगमंत्री उदय सामंत यांची अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची पाहणी…

vishwatmaklokswamivarta

पेट्रोरसायन अभियांत्रिकी व उद्योग संस्थेचा विनामूल्यप्लास्टिक प्रोसेसिंग अभ्यासक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta