छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी) – भारतीय डाक विभागाच्या वतीने राष्ट्रीयस्तरावरील ‘ढाई आखर’ पत्रलेखन स्पर्धा २०२६-२७ आयोजित करण्यात आली आहे. ‘मातृभूमीला एक पत्र : निसर्गाच्या संरक्षणासाठी माझे वचन’ या विषयावर आयोजित या स्पर्धेसाठी दि. ३१ ऑक्टोबर पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. नागरिकांनी, विशेषतः विद्यार्थी व युवकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय डाक विभागाने केले आहे.
या स्पर्धेत देशातील सर्व नागरिकांना सहभागी होता येणार आहे. त्यासाठी कोणतीही किमान वयोमर्यादा नाही. स्पर्धकांना इंग्रजी, हिंदी किंवा प्रादेशिक भाषेत पत्र लिहिता येईल. स्पर्धेसाठी १८ वर्षांपर्यंत आणि १८ वर्षांपेक्षा अधिक असे दोन वयोगट निश्चित करण्यात आले आहेत.
हस्तलिखीत पत्र अनिवार्य स्पर्धेतील प्रवेशिका अंतर्देशीय पत्र (Inland Letter Card) आणि लिफाफा (Envelope) अशा दोन प्रकारांत स्वीकारण्यात येतील. पत्र हस्तलिखित असणे अनिवार्य आहे. लिफाफा प्रकारातील पत्र साध्या ए-४ आकाराच्या कागदावर लिहिलेले असावे व त्यासाठी कमाल शब्दमर्यादा एक हजार शब्द आहे. अंतर्देशीय पत्र प्रकारासाठी कमाल शब्दमर्यादा ५०० शब्द आहे. टंकलिखित अथवा मुद्रित पत्रे स्पर्धेसाठी स्वीकारण्यात येणार नाहीत.
परिमंडळ व राष्ट्रस्तरावर पारितोषिके स्पर्धेतील उत्कृष्ट पत्रांना डाक परिमंडळ तसेच राष्ट्रीय स्तरावर पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. डाक परिमंडळ स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी, तसेच राष्ट्रीय स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार आहेत.
३१ ऑक्टोंबर पूर्वी प्रवेशिका मागविल्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी निर्धारित मार्गदर्शक सूचनांनुसार आपापल्या प्रवेशिका दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी सादर कराव्यात. या स्पर्धेसाठी संचालक, मुंबई जीपीओ, मुंबई-४००००१ यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पत्रलेखनाच्या माध्यमातून देशप्रेम तसेच निसर्ग व पर्यावरणाच्या संरक्षणासाठीची आपली बांधिलकी व्यक्त करण्याची ही उत्तम संधी आहे, जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक, विद्यार्थी व युवकांनी या पत्रलेखन स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय डाक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.