
पुढची २५ वर्षे देशासाठी महत्त्वाची असून यामध्ये कर्तव्य, कर्तव्य, कर्तव्य हा मंत्र जपायला हवा असं मोदी म्हणाले.
दिल्ली प्रतिनिधी :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचं पावित्र्य कायम राखण्यासाठी गुणवत्तापूर्ण वादविवाद व्हायला हवा असं म्हटलं आहे. ते शिमल्यात आय़ोजीत करण्यात आलेल्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या ८२ व्या अखिल भारतीय परिषदेला व्हर्च्युअली संबोधित करत होते. यावेळी त्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांची संविधान, सभा आणि जनतेसाठी असेलली जबाबदारी यावर संवाद साधला. सदनात क्वालिटि डिबेट व्हावं आणि राजकीय चिखलफेक नको असं म्हणत सदनात संवादावर भर द्यायला हवा असंही मोदींनी म्हटलं.
मोदी म्हणाले की, आपल्या संसदेची परंपरा आणि व्यवस्था ही भारतीय हवी. आपली रणनिती, कायदा हा भारतीयत्व, एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पाला बळ देणारा असावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संसदेत आपला स्वत:चा वावर हा भारतीय मूल्यांप्रमाणे असावा ही आपली जबाबदारी आहे. आपला देश हा विविधतेने संपन्न असा आहे. हजारो वर्षांच्या विकासाच्या प्रवासात आपण विविधतेत एकता आणि अखंडता कायम ठेवली आहे. हीच एकता आपल्या विविधतेला आणखी मोठं करते, तसंच संरक्षण करते. सदनामध्ये वर्षातून ४-५ दिवस असे ठेवता येतील का जे समाजासाठी काही विशेष करणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्यांचा अनुभव सांगता येईल असाही प्रश्न मोदींनी विचारला.देशाला गेल्या काही वर्षात एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. अनेक असामान्य अशा गोष्टी साध्य केल्या आहेत. प्रत्येकाच्या प्रयत्नामुळे हे शक्य होऊ शकतं. लोकशाहीत जेव्हा आपण प्रत्येकाच्या प्रयत्नाबद्दल बोलतो, भारताच्या व्यवस्थेबद्दल बोलतो तेव्हा सर्व राज्यांची भूमिका महत्त्वाची ठरते असंही मोदी म्हणाले



