
औरंगाबादेत राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश…अमरावतीसारख्या दंगली घडल्या… तर
औरंगाबादः प्रतिनिधी: त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात. अमरावतीत दंगल उसळते. जनतेच्या मूळ प्रश्नांवरून लक्ष भरकटवण्यासाठीच अशा दंगली घडवल्या जातात. मात्र अमरावतीत जे घडले, तशी घटना महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात घडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सोडायचं नाही. अशा लोकांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेत दिला. शहरात आयोजित मराठवाडास्तरीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उद्देशून ते बोलत होते.
प्रत्येक घरावर मनसेचा झेंडा लावा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या औरंगाबाद दौऱ्यात हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला. शहरात राज ठाकरे येण्यापूर्वी जय श्रीराम चा नारा देणारे बॅनर लावण्यात आले होते. तसेच कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उद्देशून बोलताना राज ठाकरे यांनी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर मनसेचा झेंडा असला पाहिजे, असे आदेश दिले. तसेच शहरातील प्रत्येक चौकात पक्षाचा झेंडा लावा असेही ते म्हटले. निवडणुकीपूर्वी लोकांचा विश्वास संपादन करा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
राज ठाकरेंची पाठ फिरण्यापूर्वीच बॅनर काढले
दरम्यान महापालिकेने मंगळवारी कारवाई करत सर्वच पक्षांचे शहरात लावलेले बॅनर काढले. राज ठाकरे शहरात येण्यापूर्वी मनसैनिकांनी पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे लावे होते. ठाकरे यांनी शहर सोडण्यापूर्वीच महापालिकेने कारवाईचा बडगला उगारत शहरातील सर्व अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स जप्त केले. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले होर्डिंग, आमदार अंबादास दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले 25 ते 30 फूट उंच होर्डिंग काँग्रेसने लावलेले होर्डिंगही जप्त केले.



