
फडणवीस यांची चौकशी करा : पटोले
मुंबई प्रतिनिधीफोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु या प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक आहे, अशी सर्वोच्च न्यायालयाची सूचना आहे. सरकारमधील वरिष्ठाचा आशिर्वाद असल्याशिवाय रश्मी शुक्ला हे धाडस करणे अशक्य आहे. अवैधपणे फोन टॅप केल्याप्रकरणात तत्कालिन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही हात होता. त्यमुळे, गृहमंत्री या नात्याने यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
पटोले म्हणाले की, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार असताना २०१७-१८ मध्ये माझ्यासह, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपतील अनेक मंत्री, नेते, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन बेकायदा टॅप करण्यात आले होते. दहशतवादी कारवाया, अमली पदार्थांचा व्यापार अशा गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी विशेष परवानगी घेऊन फोन टॅपिंग केले जाते. परंतु आमचा याच्याशी काहीही संबंध नसताना आमचे फोन टॅप करण्यात आले. फोन टॅप करुन एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवणे हा गुन्हा आहे.



