
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली असून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईविरोधात लढत राहायचं, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला…
मुंबई : प्रतिनिधी प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नव्हती. आता मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली असून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईविरोधात लढत राहायचं, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून माहिती देण्यात आली
मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची मालमत्ता ईडीने जप्त केली. त्यानंतर महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच यापूर्वीही राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांवर कारवाई करण्यात आली. केंद्रीय तपास यंत्रणांच्या वाढत्या कारवायांबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारले असता त्यांनी घाबरू नका, आपण लढत राहायचं, असा निर्धार व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकारची जशास तसं उत्तर देण्याची तयारी असल्याचं समजते. त्यामुळे आता महाविकास आघाडी विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणा हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि ईडीच्या काही अधिकाऱ्यांविरोधात पुरावे दिले होते. त्यांच्यावरील कारवाईचं काय झालं? असा प्रश्न काही आमदारांनी बैठकीत उपस्थित केला. त्याबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी संबंधित आमदारांसोबत चर्चा केल्याचे समजते. आता राज्य सरकार ईडी कारवायांना कसं उत्तर देते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर दोन दिवसांपूर्वी ईडीने कारवाई केली. त्यांच्या निलांबरी प्रोजेक्टमधील ११ सदनिका जप्त करण्यात आल्या. तसेच त्यांचे हवाला ऑपरेटरसोबत संबंध असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे.



