
देशातील 2.4 कोटी रेशन कार्ड रद्द; महाराष्ट्रातील 21 लाखहून अधिक बनावट व अपात्र शिधापत्रिकांचा समावेश…
नवी दिल्ली प्रतिनिधी
शिधापत्रिकाधारकांवर मोठी कारवाई करत सरकारने गेल्या काही दिवसांत सुमारे अडीच कोटी शिधापत्रिका रद्द केल्या आहेत. याबाबतची माहिती शासनाकडून देण्यात आली.
शिधापत्रिकाधारकांवर मोठी कारवाई करत सरकारने गेल्या काही दिवसांत सुमारे अडीच कोटी शिधापत्रिका रद्द केल्या आहेत. याबाबतची माहिती शासनाकडून देण्यात आली. राज्यसभेत भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ग्रामीण विकास आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती (Sadhvi Niranjan Jyoti) यांनी ही मोठी माहिती दिली.
महाराष्ट्रात 21लाखाहून अधिक शिधापत्रिका रद्द –
केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीत, 2017 ते 2021 या पाच वर्षांत देशात डुप्लिकेट, अपात्र आणि बनावट 2 कोटी 41 लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. एकट्या बिहारमध्ये 7.10 लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. यादरम्यान उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 1.42 कोटी शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्यात 21.03 लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत.
यावेळी सरकारने पुन्हा एक मोठे पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA), रेशनचा लाभ घेतलेल्या 70 लाख कार्डधारकांचा संशयितांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. हा डेटा केंद्राने ग्राउंड व्हेरिफिकेशनसाठी राज्यांना पाठवला आहे. पडताळणीमध्ये, ज्यांची नावे यादीत समाविष्ट झाली आहेत ते NFSA अंतर्गत रेशन मिळण्यास पात्र आहेत की नाही हे शोधून काढले जाईल.
दरम्यान, अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले की, जर 70 लाखांपैकी निम्मेही नियमानुसार योग्य आढळले नाहीत तर त्यांची जागा रद्द करून नवीन पात्रांना संधी दिली जाईल. शिधापत्रिका रद्द केल्यानंतर त्यांच्या जागी नवीन पात्र नागरिकांची नावे जोडली जातात.



