
मुंबईत दुकानांवर मराठी फलक न लावल्यास सोमवारपासून होणार कारवाई; मुंबई महानगरपालिकेचा चा इशारा…
मुंबई प्रतिनिधी
मार्च 2022 मध्ये, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सर्व दुकानांवर देवनागरी लिपीत मराठी फलक लावणे आवश्यक आहे असा निर्णय घेतला होता.
दुकानदारांना त्यांच्या दुकानांवर मराठी फलक लावण्यासाठी बीएमसीने (BMC) अनेक वेळा मुदतवाढ दिली आहे. आता अजूनही असे फलक न लावणाऱ्या दुकानदारांवर बृहन्मुंबई महानगरपालिकाने सोमवारपासून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. बीएमसीने चार वेळा मुदतवाढ देऊनही मोजक्याच दुकानदारांनी मराठीमध्ये फलक लावले आहेत. उपमहापालिका आयुक्त, (विशेष) संजोग काबरे यांनी सांगितले की, ते किती दुकानांनी त्यांच्या दुकानांवर मराठी फलक लावले आहेत ते पाहणार आहेत.
ज्यांनी अजूनही मराठी फलक लावले नसतील त्यांना सात दिवसांचा इशारा देण्यात येईल व त्याचेही पालन न केल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. काबरे पुढे म्हणाले, कायद्यानुसार ते दुकानदाराकडून प्रति कामगार 2,000 रुपये दंड आकारू शकतात. सुमारे 48 टक्के दुकानदारांनी आदेशाचे पालन केल्याचे एफपीजेने निदर्शनास आणून दिले आहे. यावर काबरे म्हणाले, मुंबईत अंदाजे 5 लाख दुकाने आहेत. त्यातील 2 लाख दुकानांना त्यांनी भेटी दिल्या असून त्यापैकी 1 लाख दुकानांनी मराठी फलक लावले आहेत.
राज्य सरकारच्या मराठी फलक लावण्याच्या आदेशाविरोधात रिटेलर्स असोसिएशन सुप्रीम कोर्टात गेली होती, पण कोर्टाने कोणताही आदेश दिलेला नाही. मार्च 2022 मध्ये, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सर्व दुकानांवर देवनागरी लिपीत मराठी फलक लावणे आवश्यक आहे असा निर्णय घेतला होता



