
राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ आज महाराष्ट्रात; रात्री 9 च्या सुमारास दिसणार कधीही न पाहिलेलं चित्र..
राज्य प्रतिनिधी
: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. नांदेडमधील देगलूर येथून ही यात्रा महाराष्ट्रात येईल. यावेळी काँग्रेस नेत्यांसोबतच इतरही राजकीय पक्षातील मंडळी यात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध संघटनाही यात्रेचं स्वागत करणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळं ‘भारत जोडो यात्रे’च्या स्वागतासाठी उपस्थित राहणार नसल्याचं वृत्त समोर येत आहे. दरम्यान, यात्रेसाठी सध्या राज्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्व तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे.
यात्रेच्या या पुढच्या टप्प्यात सोमवारी (आज) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास नव्या रोखानं प्रवास सुरु होईल. यावेळी पदयात्रोत सहभागी असणाऱ्यांच्या हाती असणाऱ्या मशाली यात्रेला एक वेगळं स्वरुप देणार असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
पहिल्यांदाच असेल मशाल यात्रेचा टप्पा (Mashal Yatra)
8 नोव्हेंबरला असणाऱ्या श्री गुरुनानक जयंतीच्या (Gurunanak jayanti) शुभ पर्वाच्या निमित्तानं राहुल गांधी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास नांदेडमध्ये गुरुद्वाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेतील. ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात (Bharat Jodo yatra in maharashtra) येताच एक नवा टप्पा सर्वांना पाहायला मिळणार आहे. कारण, या यात्रेत पहिल्यांदाच मशाल यात्रेचं स्वरुप अनेकांना पाहता येणार आहे.
सोमवारी म्हणजेच आज भारत जोडो यात्रा सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी देगलूर येथे येईल. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास यात्रा वन्नाळीच्या दिशेनं निघेल. नांदेडमध्ये यात्रा चार दिवसांसाठी तर हिंगोलीमध्ये (Hingoli) साधारण आणखी चार दिवसांसाठी मुक्कामी असणाऱ आहे.
राहुल गांधी या यात्रेच्या माध्मातून पुढचा प्रवास वाशिममधून (washim) करणार आहेत. यात्रेचा मुक्काम मंगळवारी शंकरनगर रामतीर्थ, बुधवारी वझिरगाव फाटा, गुरुवारी पिंपळगाव आणि शुक्रवारी हिंगोलीत असेल.



