
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध …
पुणे – प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावी बोर्डाची लेखी परीक्षा फेब्रुवारी महिन्यात तर दहावीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात सुरू होणार आहे. बोर्डाकडून अंतिम परीक्षेचं वेळापत्रक आज संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
बारावीच्या लेखी परीक्षेची सुरुवात २१ फेब्रुवारीला होणार आहे. या परीक्षा २१ मार्चपर्यंत सुरू राहतील. तर दहावीची लेखी परीक्षा २ मार्चला सुरू होऊन २५ मार्चला संपतील असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
परीक्षा मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
लेखी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक १९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानतंर वेळापत्रकाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. यासाठी मंडळाकडून १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. वेळापत्रकाबाबत आलेल्या सूचनांनंतर दहावी आणि बारावीचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात येतात.



