
ओबीसी एल्गार सभेची पोस्ट टाकणार्या शिक्षकावर कारवाई; मग मराठा सभेच्या पोस्ट करणार्या 26 शिक्षकांना अभय का?ओबीसी समाज समन्वय समितीचा आरोप; सीईओ,शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
राज्य प्रतिनिधी ओबीसी एल्गार सभेची पोस्ट फेसबुकवर पोस्ट केल्या प्रकरणी ईश्वर गाडेकर या शिक्षकावर जी कारवाई जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,शिक्षणाधिकारी यांनी केली;तशीच कारवाई मराठा आंदोलनाची सोशल मीडियावर 50 – 50 पोस्ट करणार्या 26 शिक्षकांवर का केली नाही? प्रशासनातील अधिकारी मराठा समन्वयक यांच्या दबावाखाली येऊन जातीयवाद करीत आहे,असा गंभीर आरोप ओबीसी समाज समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.
येथील ओबीसी समाज समन्वय समितीच्या कार्यालयात बुधवारी ( दि.7 ) पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हा समन्वयक अशोक पांगारकर, दीपक बोराडे ,प्रा.सत्संग मुंडे,बळीराम खटके,राजेंद्र राख,कैलास फुलारी यांची उपस्थिती होती. यावेळी बोलता दीपक म्हणाले, अंबड येथील ओबीसी एल्गार सभेची पोस्ट फेसबुकवर पोस्ट शिक्षक ईश्वर गाडेकर यांनी केली होती. याबाबत मराठा क्रांती समन्वयक यांनी तत्कालीन शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांच्याकडे तक्रार केली. त्यावरून गाडेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या दालनात गाडेकर आणि त्यांच्या शिक्षिका पत्नी यांना उभे करून अपमानास्पद वागणूक देण्यात आली आणि जाहीर माफी मागायला लावली. दरम्यान,मी अशाच पद्धतीने मराठा आंदोलनाची सोशल मीडियावर तब्बल 50 – 50 पोस्ट करणार्या 26 मराठा शिक्षकांची तक्रार शिक्षणाधिकारी आणि सीईओ कडे केली होती. मात्र, यावर या अधिकार्यांनी कोणताही कारवाई केली नाही. उलट याबाबत सुनावणी घेण्याची नोटीस काढली आणि त्यांत माझी शिक्षक ईश्वर गाडेकर यांच्याबाबत तक्रार असल्याचे नमूद केले. माझी
तक्रार ही त्या 26 शिक्षकाच्या विरोधात होती. मात्र शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी मराठा शिक्षकांच्या नावे नोटीस काढली नाही. ईश्वर गाडेकर जर दोषी असेल तर तोच न्याय या 26 शिक्षकांना लावला पाहिजे. पण जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांनी जातीयवाद सुरू केला आहे,असा आरोप बोराडे यांनी केला.
सीईओ,शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करा!
जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणे आहेत. तथापि, येथील प्रशासनाने आता जातीयवाद करण्यास सुरुवात केली आहे. ओबीसी शिक्षकावर कारवाई केली मात्र 26 मराठा शिक्षकांना पाठीशी घातले जात आहे. याबाबत आम्ही ओबीसी पदाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गेलो की ते अरेरावीची आणि उद्दामपणाची भाषा वापरतात. त्यामुळे जर 26 शिक्षकांवर देखील कारवाई केली नाही तर या अधिकाऱ्यांच्या विरोधात मोठे आंदोलन करून यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शासनाकडे करू,असेही यावेळी सांगण्यात आले.
—



