
वसंतराव नाईक जयंतीनिमित्त वृक्षरोपणवृक्ष लागवड व संगोपनात सर्वांनी योगदान द्यावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर (जिमाका)- पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. तापमान वाढ दरवर्षी नवा उच्चांक गाठत आहे. सगळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. त्यावर उपाय म्हणजे समाजातील सर्व घटकांनी वृक्ष लागवड व संगोपन चळवळीत आपले योगदान दिले पाहिजे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.
येथील वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन करुन वृक्ष रोपण करण्यात आले. नाईक महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.अभय राठोड, सचिव नितीन राठोड, सचिव डॉ बिपीन राठोड, डॉ.श्रीरंग देशपांडे, उपप्राचार्य बिलाल कुरेशी, मुख्याध्यापक आर जी जाधव, मुक्तेश्वर श्रीमंगले, श्रीमती शैलजा अत्रे, तहसीलदार रमेश मुनलोड आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, विद्यार्थी घडविणे हे सगळ्यात पवित्र कार्य आहे. विद्यार्थ्यांचा विकास होऊन समाजाला एक चांगला नागरिक मिळणे ही खरी समाजसेवा आहे. पर्यावरणाच्या समस्येवर उपाय म्हणजे वृक्ष लागवड होय. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविले आहे. प्रत्येकाने एक वृक्ष लागवड करुन त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेतल्यास सहजच आपले उद्दिष्ट पूर्ण होईल. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येऊन सहयोग देण्याची गरज आहे,असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की,समाजातील विविध कुप्रथांचेही निर्मूलन करण्यासाठी आपण साऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, त्यातून चांगला समाज आपण घडवू.
प्रारंभी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. प्रास्ताविक उपप्राचार्य सुरेश भाले यांनी केले. महाविद्यालयाच्या ‘वसंत’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत गीत सादर करण्यात आले. उत्कृष्ट कार्य करणारे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सुरेश चव्हाण यांनी सुत्रसंचालन केले.
०००००



