
अनुसूचित जाती-जमातींची जनगणना न होता वर्गीकरणाला आधार कशाचा ? – अण्णासाहेब कटारे..
( सुरेश गायकवाड ) मुंबई- महाराष्ट्रात अनुसूचित जाती-अनुसूचित जमातीची जनगणना झालेली नाही मग वर्गीकरण कशाच्या आधारावर होणार हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात तर क्रिमिलियरची तरतूद केलेली आहे ही भयावह बाब आहे. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
यावेळी त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निर्णयामुळे अनुसुचित जाती अनुसुचित जमाती समुहांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन आपआपसांत वाद होऊन तो समुह विखुरला जाण्याची भिती व्यक्त केली.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची घोडदौड संपूर्ण महाराष्ट्रात जोमाने सुरू आहे सर्व स्तरातील लोक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहे . महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दररोज असंख्य नेते , जेष्ठ नागरिक , महिला युवक , युवती पक्षात दाखल होत आहे . त्यामुळे मुंबईमध्ये देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने कंबर कसली आहे.
मुंबईच्या बऱ्याचशा भागात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने आपले जाळे पसरविले आहे. मुंबईमध्ये आणखी पक्षाची ताकद भक्कमपणे उभी करण्यासाठी पक्षाने जुने जाणते रिपब्लिकन नेते अनंत पांचाळ यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मुंबईमध्ये पक्ष बळकट होण्यास मदत होईल असा विश्वास राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी अनंत पांचाळ यांच्या निवडी प्रसंगी केला.



