प्रत्येकाच्या स्मृतीकोषात शिक्षकाचे स्थान अढळ- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
राज्य प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, ):- प्रत्येकाचे शिक्षक आणि त्यांच्या स्मृती ह्या बालमनावर कायमच्या कोरल्या जातात. प्रत्येक व्यक्तिच्या स्मृतीकोषात शिक्षकांचे स्थान नेहमी अढळ असते, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शिक्षकांची महती सांगितली. त्यामुळे शिक्षकांनी अधिक सजगतेने भावी नागरिक घडविण्याचे आपल्यावर सोपवलेले कर्तव्य पार पाडावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज पैठण येथे केले पैठणच्या सेंट पॉल हायस्कूल येथील सभागृहात आज ‘दशसूत्री’ अंमलबजावणीसाठी पैठण तालुक्यातील जि.प. शाळा मुख्याध्यापकांची कार्यशाळा पार पडली.
उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.) जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी(माध्य.) आश्विनी लाटकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य सान्वी देशमुख, तहसिलदार सारंग चव्हाण, उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, विद्यार्थ्यांना घडविणे हे अत्यंत पवित्र कार्य आहे. मुलांना देशाचे भावी नागरिक म्हणून आपण घडवित आहोत ह्या जबाबदारीचे भान असू द्यावे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाठी दशसूत्री कार्यक्रम तयार केला आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता नाही. वेगळा वेळ द्यायची गरज नाही. हा कार्यक्रम आपल्याला आपली दैनंदिन शैक्षणिक काम करीत असतांनाच करता येणार आहे. या कामातून आपल्याला चांगले काम केल्याचे समाधान मिळणार आहे,असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. प्रत्येकाच्या स्मृतीत आपल्या शिक्षकांच्या स्मृती कायम कोरल्या जातात. त्या नेहमी चांगल्या रहाव्या यासाठी आपण सगळ्यांची सचोटीने आपले कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे,असेही त्यांनी सांगितले. सुत्रसंचालन किरण गाडेकर तर आभारप्रदर्शन अनिल पुल्हाट यांनी केले.०००००