ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी कार्यालय सुसज्ज करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी
-ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी आपल्या गावात आपले कार्यालय अद्यावत व सुसज्ज ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या विभागाची , कामकाजाची ओळख निर्माण होते. गावातील समाजोपयोगी व सेवा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
कन्नड तहसिल कार्यालयात कन्नड तालुक्यातील ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रांताधिकारी संतोष गोरड, तहसिलदार विद्याधर कडवकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी उपस्थित ग्राम महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, सजा हे गावपातळीवरील कार्यालय हे कायद्याद्वारे स्थापित कार्यालय आहे. या कार्यालयाचे अस्तित्व गावात असल्याने आपल्या विभागाची, कामकाजाची ओळख निर्माण होते. गावातील लोकांशी समन्वय निर्माण होतो. ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी गावात शासनाच्या विविध सेवा योजनांच्या अंमलबजावणीत लक्ष द्यावे. जेणेकरुन लोकांना त्यांच्या अडचणीच्या वेळी मदत करता येईल. तसेच विविध अर्थसहाय्य योजनांची कामे, दिव्यांगांच्या संख्यांची नोंद करुन त्यांना लाभ मिळवून देणे अशा समाजोपयोगी उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा,असे निर्देश त्यांनी दिले.०००००