आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणव जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न
जालना, प्रतिनिधी :- जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापनबाबत प्रशिक्षण व जनजागृतीपर कार्यक्रम महसूल भवन येथे पार पडला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थाप प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे व सरिता सुत्रावे, तहसीलदार प्रणाली तायडे, मुंबई सेवाचे चिंतामणी कदम, अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे, 108 रुग्णवाहिका समन्वयक मनोज जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख दीपक काजेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यामध्ये प्राथमिक आगीपासुन बचाव व सुरक्षीतेकरीता रंगीत तालीम तसेच अग्निशामक यंत्राचा वापर कशाप्रकारे करावा याबाबत अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे यांनी मार्गदर्शन केले. तर सीपीआर अर्थात प्रथमोपचार कसा प्रकारे करावा याबाबत 108 रुग्णवाहिका समन्वयक मनोज जाधव यांनी प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली.
आपत्तीचे नैसर्गिक व मनुष्यनिर्मित आपत्ती असे दोन प्रकार पडतात. आग, पुरपरिस्थिती, रस्ते अपघात, दुष्काळ, भूकंप, साथीचा रोग, वीज पडणे आदि आपत्तीमध्ये करावयाच्या उपाययोजनांची माहिती देत अपघातग्रस्तांना कशाप्रकारे मदत पुरवावी तसेच प्रथमोपचार औषध पेटीमधील साहित्याचा वापर कशाप्रकारे करावा. अपघातग्रस्त व्यक्तींच्या हातावरील रक्तस्त्राव तसेच डोक्यावरील जखमेला कशाप्रकारे पट्टी बांधावी म्हणजे त्या व्यक्तीस दवाखान्यात दाखल करेपर्यंत आराम मिळेल आणि त्याचा जीव वाचू शकेल यासाठी सविस्तर माहिती मुंबई सेवाचे चिंतामणी कदम यांनी दिली. तसेच अतिघाई, काळजी तसेच जंकफुडपासून दूर राहण्याचा सल्लाही दिला. नागरिकांना आपातकालीन परिस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष -1077, पोलिस नियंत्रण कक्ष-100/112, रुग्णवाहिका-108/102 आणि अग्निशामक दल-101 या क्रमांकावर त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.