पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतसहभागी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी अनिवार्य..
ठाणे, प्रतिनिधी:- पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना दि.12 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये कोकण विभागात भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी व युनिव्हरसल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यांमार्फत मृग बहार सन 2024 मध्ये चिकू, फळपिकासाठी तर आंबिया बहार सन 2024-25 मध्ये काजू, केळी व आंबा या फळपिकांसाठी फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा घेतलेला आहे, परंतू फळपिकांची ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल ॲपद्वारे केलेली नाही त्यांनी दि.25 एप्रिल 2025 पर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी. अन्यथा दि.12 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार 7/12 उताऱ्यावर ई-पीक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपीक विम्याचा लाभ दिला जाणार नाही.
याबाबतीत सविस्तर माहितीचा दि.12 जून 2024 चा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
तरी फळपीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी दि.25 एप्रिल 2025 पर्यंत डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक बालाजी ताटे यांनी केले आहे.