पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या निषेधादरम्यान झालेल्या संघर्षात ३ जणांचा मृत्यू..
राज्य प्रतिनिधी-
झी न्यूज टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील धुलियान येथे वक्फ (सुधारणा) कायद्याविरुद्ध निदर्शने करणाऱ्या लोकांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला.
वृत्तसंस्था एएनआयने वृत्त दिले आहे की पश्चिम बंगाल पोलिसांनी मुर्शिदाबाद येथेही तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे, जिथे वक्फ कायद्याविरुद्ध निदर्शने हिंसक झाली.
पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक-शुक्रवारीही मुर्शिदाबाद येथे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमले होते. या लोकांकडून वक्फ कायद्याला विरोध करण्यात आला होता. आंदोलनकर्ते वक्फ कायद्याविरोधात घोषणाबाजी करत होते. आंदोलनादरम्यान समशेरगंज याच परिसरात असणाऱ्या धुलियम भागातील राष्ट्रीय महामार्ग-12 अडवून धरला. मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. काही वाहनांची जाळपोळही करण्यात आली होती. यात एकूण 10 पोलीस अधिकारी जखमी झाले होते.
शनिवारी हीच हिंसा धुलियान या भागापर्यंत वाढली. या भागात एका व्यक्तीला गोळी लागल्याची माहिती मिळते आहे. स्थितीवर नियंत्रण मिळवता यावे म्हणून पोलीस लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सर्व घडामोडी घडत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वक्फ कायद्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पश्चिम बंगालमध्ये हा कायदा लागू होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. “ज्या कायद्यामुळे लोकांत नाराजी आहे, तो कायदा आम्ही बनवलेला नाही. हा केंद्र सरकारने तयार केलेला कायदा आहे. मी याआधीच स्पष्ट केलेलं आहे की, पश्चिम बंगालमध्ये या कायद्याची अंमलबजावणी होणार नाही. मग हा हिंसाचार कशासाठी केला जातोय,” असं ममता बॅनर्जींनी म्हटलंय.