कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठीआता शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य…
सांगली, प्रतिनिधी : कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता आता अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) दिनांक 15 एप्रिल 2025 पासून अनिवार्य करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळख क्रमांकसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. त्यासाठी ग्राम विकास समिती, सीएनसी केंद्र व क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी, असे आवाहन कृषि विभागामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
राज्यातील कृषि क्षेत्रात डिजीटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने राज्यात अॅग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहेत. यामध्ये महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्याची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतांसह एकत्रितरीत्या शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) देण्यात येत असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.