आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज-पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांची माहिती
पालघर प्रतिनिधी-आगामी मान्सून काळात संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी आवश्यक ती तयारी सुरू असून आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी केले.
मान्सूनपूर्व आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे करण्यात आले यावेळी पालकमंत्री श्री .नाईक बोलत होते
या बैठकीस खासदार डॉ.हेमंत सावरा, आमदार स्नेहा दुबे, आमदार राजन नाईक, आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर, श्री.खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम तसेच आपत्ती व्यवस्थापन विभाग, महापालिका, आरोग्य, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, रेल्वे, पोलीस व इतर संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यामध्ये धरणाचे पाणी नदीच्या पात्रात सोडण्यापूर्वी नदी काठावरील गावामध्ये दवंडी देऊन गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत स्तरावरून करावे. तसेच पावसाळ्यामध्ये रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी रेल्वे विभागाने पावसाळ्यापूर्वी ज्या ठिकाणी पाणी जमा होते. अशा ठिकाणी भराव टाकावा. रेल्वे सेवेमध्ये कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
वादळी वाऱ्यांचा इशारा हवामान विभागाने दिल्यावर मत्स्य व्यवसाय विभागाने तात्काळ मच्छीमारांना समुद्रात जाण्यापासून रोखावे जे मच्छीमार समुद्रात गेले असतील त्यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसेच पावसाळ्यात एखादी परिस्थिती उद्भवली असता नजीकच्या शाळेत स्थानिकांची राहण्याची सोय करता येण्यासाठी ज्या शाळा सुस्थितीत नसतील पावसाळ्यापूर्वी अशा शाळा दुरुस्त करून घ्याव्यात तसेच डहाणू आणि जव्हार येथील प्रकल्प अधिकारी यांनी आश्रम शाळा सुस्थितीत आहेत का याची पाहणी करून त्या सुस्थितीत कराव्यात असे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
कृषी अवजारे, बी बियाणे आणि खते यांचा मुबलक साठा उपलब्ध असून शेतकरी बांधवांना बी बियाणेआणि खते कमी पडणार नाहीत, असे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.
कृषी आणि वन विभाग यांनी संयुक्तरीत्या सुरंगी या सुगंधित झाडाची लागवड करावी. एक सुरंगीचे झाड 100 एकर परिसरामध्ये सुगंध देते. अशा महत्त्वपूर्ण झाडाची लागवड कृषी आणि वन विभाग यांनी करावी, असे निर्देश कृषी आणि वन विभागाला पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
पंचायत राज दिनानिमित्त खानिवडे ग्रामपंचायत यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.