ठाणे जिल्ह्यातील खाडीपात्रातील वाळू उपसा थांबला-जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ठाणे, प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील खाडीपात्रांमधून होणारा वाळूचा अनधिकृत उपसा थांबविण्यात आला आहे. ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील आणि संबंधित तहसिलदार उमेश पाटील यांनी संयुक्तपणे ही कार्यवाही केली.
उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या वाळू गटांची पाहणी/तपासणी करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले होते. या निर्देशानुसार, ठाणे उपविभागातील खाडी भागातील विविध वाळू गटांची पाहणी करण्यात आली. यात प्रामुख्याने वसई खाडी (गायमुख बंदर, कामवाडी नदी) आणि उल्हास नदी (डोंबिवली ते कल्याण) या भागांचा समावेश होता.
वसई खाडीपात्रातील पाणजू बेट ते घोडबंदर वाळू गटातील मौजे वरसावे येथील खाडीलगत मळई क्षेत्र 0-80-0 हेक्टर आर जमीन, गायमुख बंदर ते कामवाडी नदी या वाळू गटातील मौजे गायमुख (भाईंदरपाडा) येथील खाडीलगत मळई क्षेत्र 0-60-0 हे.आर. जमीन आणि उल्हास नदी खाडीपात्रातील डोंबिवली ते कल्याण वाळू गटातील मुंब्रा रेतीबंदर, मौजे कळवे येथील खाडीलगत मळई क्षेत्र 0-80-00 हे. आर जमीन या तीन ठिकाणी प्राप्त माहितीनुसार, शासकीय जागेत वाळू साठा दिसून आला आहे. तसेच दरम्यानच्या भागात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या पाहणीत अनियमितता आढळल्याने तातडीने वाळू उपसा थांबविण्याचे आदेश देण्यात आले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील खाडीपात्रांचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. जिल्हा प्रशासनाने यापुढेही अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या कारवाईत प्रांताधिकारी उर्मिला पाटील, तहसिलदार उमेश पाटील यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.