
T 20 विश्वचषकात भारत- पाकिस्तान सामना रंगणार, दोन्ही संघ एकाच गटात, आयसीसीने जाहीर केले गट….
पात्रता फेरीसह ४५ सामने खेळवले जातील.
प्रतिनिधी : भारत- पाकिस्तान क्रिकेट सामन्यांचा आनंद लुटणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. १७ ऑक्टोबरपासून यूएईत होणाऱ्या २०-२० विश्वचषकासाठी आयसीसीने शुक्रवारी सहभागी संघांचे गट जाहीर केले. यानुसार हे दोन्ही संघ एकाच गटात असून न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचादेखीेल याच गटात समावेश करण्यात आला आहे.
अन्य गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचा समावेश आहे. गटातील अन्य संघांचा निर्णय विश्वचषक पात्रता फेरीच्या निकालानंतर होणार आहे. विश्वचषकाचे सामने १४ नोव्हेंबरपर्यंत चालतील. पात्रता सामन्यासह एकूण ४५ सामने खेळविले जातील. पात्रता फेरीत १२, सुपर १२ फेरीत ३० आणि दोन उपांत्य तसेच एका अंतिम सामन्याचा यात समावेश आहे.
असे होतील सामने…
सुरुवातीला पात्रता सामने खेळले जातील. त्यात आठ संघ असून प्रत्येक गटात ४-४ संघांचा समावेश आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर १२ फेरीत ६-६ संघांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. एक संघ पाच सामने खेळेल. सुपर १२ संघ २० मार्च २०२१ च्या आयसीसी क्रमवारीनुसार निश्चित करण्यात आले आहेत. सुपर १२ फेरीनंतर दोन्ही गटातील अव्वल प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीतील विजेते १४ नोव्हेंबर रोजी जेतेपदासाठी खेळतील.



