मुंबईला पाणीपुरवठा करणारा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा धरण आज सायंकाळी ओसंडून वाहू लागले…
मुंबई प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा धरण आज सायंकाळी ओसंडून वाहू लागले. मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सात प्रमुख जलाशयांपैकी एक असलेल्या या धरणाचा साठा पूर्ण क्षमतेपर्यंत भरल्याने ही आनंददायक बाब मानली जात आहे.
मुंबईसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या एकूण सात जलाशयांमध्ये तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, वरची वैतरणा, भातसा, विहार आणि तुलसी या धरणांचा समावेश होतो. आज सकाळी सहा वाजेपर्यंतच्या माहितीप्रमाणे या सर्व जलाशयांमधील एकत्रित पाणी साठा छप्पण दशांश अठ्ठ्याऐंशी टक्के इतका झाला आहे
काल सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी तानसा धरणातून पाणी वाहू लागल्याची नोंद झाली. याआधी मोडक सागर धरण 9 जुलै रोजी आणि मध्य वैतरणा धरण 7 जुलै रोजी ओसंडले होते.
तानसा धरणाची एकूण जलधारण क्षमता चौदा हजार पाचशे आठ कोटी लिटर इतकी आहे. या वर्षी अपेक्षेपेक्षा लवकर पावसाने जोर धरल्यामुळे धरण क्षेत्रात जलसाठा झपाट्याने वाढत गेला आणि अखेर आज धरण पूर्ण भरून वाहू लागले.
पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे जलसाठा लवकर भरू लागला आहे. परिणामी, यंदा मुंबईसाठी पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता अत्यंत कमी असून नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब आहे.