टपाल विभागातर्फे 4 ऑगस्टला वायव्य मुंबई विभागात अत्याधुनिक एपीटी सुविधेची सुरुवात होणारटपाल विभागातर्फे 4 ऑगस्टला वायव्य मुंबई विभागात अत्याधुनिक एपीटी सुविधेची सुरुवात होणार
मुंबई प्रतिनिधी-
डिजिटल उत्कृष्टता आणि राष्ट्र उभारणीच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा गाठत टपाल विभागाने अत्याधुनिक एपीटी सुविधेची घोषणा केली आहे. या परिवर्तनकारी उपक्रमाचा एक भाग म्हणून दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी वायव्य मुंबई विभागातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये (जोगेश्वरी ते दहिसर) एक अद्ययावत प्रणाली लागू होणार आहे.
या अत्याधुनिक डिजिटल मंचाच्या वापराकडे सुरळीत आणि सुरक्षित स्थित्यंतर होणे सुनिश्चित करण्यासाठी 2 ऑगस्ट 2025 रोजी एक कार्य बंद कालावधी नियोजित करण्यात आला आहे. या दिवशी सदर भागातील टपाल कार्यालयांमध्ये कोणतेही सार्वजनिक व्यवहार होणार नाहीत.नव्या यंत्रणेचे कार्य सुरळीतपणे आणि कार्यक्षम पद्धतीने सुरु होण्याची खात्री करून घेत, डाटा स्थलांतर, प्रणाली वैधता आणि जुळवणी प्रक्रिया सुलभतेने होण्यासाठी सेवांची ही तात्पुरती स्थगिती अत्यावश्यक आहे.
टपाल सेवेतील कार्ये जास्त अद्ययावत, अधिक कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज करण्याच्या बाबतीत टपाल विभागाच्या अढळ बांधिलकीचे प्रदर्शन घडवत सुधारित वापरकर्ता अनुभव, वेगवान सेवा वितरण आणि अधिक ग्राहक-स्नेही कार्यपद्धती देण्याच्या दृष्टीने या एपीटी सुविधेची रचना करण्यात आली आहे.
टपाल कार्यालयाला दिल्या जाणाऱ्या भेटींचे व्यवस्थित नियोजन करावे आणि थोडक्या काळासाठी विभागाचे कार्य थांबलेले असताना सहकार्य करावे असे आवाहन टपाल विभागाने स्वतःच्या अमूल्य ग्राहकांना केले आहे. या काळात होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत, प्रत्येक नागरिकाला अधिक दर्जेदार, वेगवान तसेच डिजिटल दृष्ट्या अधिक सक्षम टपाल सेवा देण्याच्या हेतूने ही पावले उचलण्यात येत आहेत अशी ग्वाही विभागाने दिली आहे.