ग्रामस्थांच्या दायित्वातून मिळत आहे अंगणवाडीतील बालकांना पौष्टिक आहार
सातारा द प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये सामाजिक दायित्वाच्या भावनेतून अंगणवाडीच्या बालकांच्या सकस व पोष्टिक आहार देण्यासाठी ग्रामस्थ स्वतःहून पुढे येत आहेत. त्यांच्या दायित्वातून बालकांना सकस व पौष्टीक आहार मिळत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ फलटणच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रियांका गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलबाबा नगर व धुळदेव येथे करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत शेंगदाणा, गुळ लाडू, खजूर, केळी, राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की काही ठिकाणी तर अगदी काजू , बदामही नागरिकांनी अंगणवाडतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी दिले.
आमची मुलं घरी असे पौष्टिक पदार्थ खात नाहीत, मात्र अंगणवाडीमध्ये एकमेकांच्या संगतीने अगदी आनंदात पौष्टिक आहार फस्त करतात अशा भावनाही पालकांनी व्यक्त केल्या.
फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार दिला जातो. नागरिकांनी आपले सामाजिक दायित्व समजून अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार द्यावे, असे आवाहनही बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रियांका गवळी यांनी केले आहे. प्रकाश मोरे, सचिन नाळे , अक्षय सोनवणे, सतीश ठोंबरे, हरी पवार व दत्तू खरात यांनी अंगणवाडीसाठी पौष्टिक आहार उपलब्ध करुन दिला.