माझं लातूर, हरित लातूर’ अभियानांतर्गत यंदा सलग दुसऱ्या वर्षी लातूर शहरातील गंजगोलाई येथे आयोजित ‘लातूर हरितोत्सव’चे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते संपन्न
माझं लातूर, हरित लातूर’ अभियानांतर्गत यंदा सलग दुसऱ्या वर्षी लातूर शहरातील गंजगोलाई येथे आयोजित ‘लातूर हरितोत्सव’चे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते संपन्न
राज्य प्रतिनिधी-
‘माझं लातूर, हरित लातूर’ अभियानांतर्गत यंदा सलग दुसऱ्या वर्षी लातूर शहरातील गंजगोलाई येथे आयोजित ‘लातूर हरितोत्सव’चे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते झाले. या निमित्ताने महात्मा गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंत वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, लातूर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ आणि संगीता टकले, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, तहसीलदार सौदागर तांदळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यात वृक्षलागवडीला गती देण्यासाठी शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांच्या सहभागातून प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना रोपे आणि वृक्षलागवडीसाठी आवश्यक साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात ‘लातूर हरितोत्सव’ या अभिनव उपक्रमाचे सलग दुसऱ्या वर्षी आयोजन केले आहे. याच ठिकाणी रानभाज्यांची माहिती देण्यासाठी आणि त्यांची विक्री करण्यासाठी ‘रानभाजी महोत्सव’ आयोजित करण्यात आला, ज्याचे उद्घाटनही जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
सकाळपासूनच लातूरकरांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रोपे आणि वृक्षलागवडीसाठी आवश्यक साहित्याच्या विक्रीसाठी उभारलेल्या स्टॉल्सना भेटी देऊन नागरिकांनी रोपांची माहिती घेतली आणि खरेदी केली. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने अनेकांनी कुटुंबासह या हरितोत्सवाला भेट देऊन फुलझाडे आणि फळझाडांच्या रोपांची खरेदी केली.यंदा हरितोत्सवासोबतच रानभाजी महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले. रानभाज्यांच्या विक्रीसाठी उभारलेल्या स्टॉल्सवर मोठी गर्दी दिसून आली. तसेच, जीआय मानांकन मिळालेल्या बोरसुरी डाळीच्या खरेदीसह महिला बचत गटांच्या स्टॉलवरील विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यास लातूरकरांनी पसंती दर्शवली. बोरसुरी डाळ, भाकरी, थालीपीठ, धपाटे यांसारख्या पदार्थांचे स्टॉल्स येथे उभारण्यात आले होते.
*वृक्षलागवड चळवळीत सर्वांचा सहभाग आवश्यक: जिल्हाधिकारी*लातूर जिल्ह्यात झाडांची संख्या अत्यंत कमी आहे. जिल्ह्याला हरित करण्यासाठी ‘माझं लातूर, हरित लातूर’ अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत वृक्षलागवड मोहिमेला गती देण्यात आली असून, प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होऊन तिला चळवळीचे स्वरूप द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. कोविडच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना समजले आहे. त्यामुळे गावात, शहरात, घराच्या परिसरात ऑक्सिजन पार्क उभारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. शेतीच्या बांधावर, रस्त्याच्या दुतर्फा, घराच्या गच्चीवर आणि मोकळ्या जागांवर फुलझाडे, फळझाडे लावून लातूरला हरित करण्यासाठी हातभार लावावा, असे त्या म्हणाल्या.
रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त असून, त्या आता दुर्मीळ होत चालल्या आहेत. नवीन पिढीला त्यांची माहिती मिळावी आणि त्यांचे महत्त्व समजावे, यासाठी आत्मा कार्यालयाने आयोजित केलेला रानभाजी महोत्सव उपयुक्त ठरेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. यावेळी रानभाज्यांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते झाले.