राज्यासह मुंबईत अनेक शहरांमध्ये हलका ते मध्यम पाऊस सुरू
मुंबई प्रतिनिधी -मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. आकाश सामान्यतः ढगाळ राहील. तसेच काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 🌊 भरती -सकाळी १०:०५ वाजता – ३.६६ मीटरओहोटी -सायंकाळी ४:१४ वाजता – २.१० मीटर🌊 भरती – रात्री ९:५२ वाजता – ३.१७ मीटरओहोटी -मध्यरात्रीनंतर ३:४६ वाजता (उद्या, ५ सप्टेंबर २०२५) – १.१३ मीटर असणार आहे
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, कोकण व घाटमाथ्यावर पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. खास करून छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरमध्येही विजांसह पावसाचा अंदाज आहे.
पुढील सात दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, या काळात शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असून, काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईत देखील ढगाळ वातावरण असेल व दुपारनंतर पावसाचा जोर वाढू शकतो.
हवामान विभागाने मुसळधार पावसामुळे पूर, वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो यासाठी प्रशासनाला जागरूक राहण्याचे, आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढला असून, खरीप पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागांत मात्र निचरा व्यवस्थेवर लक्ष देणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.