जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आवाहन; जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे
जालना, प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन तंत्रज्ञानावर आधारित शेती तसेच अन्न प्रक्रिया उद्योगावर भर देत प्रगती साधावी. तरी विषमुक्त शेती ही काळाची गरज झाली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
आज दि. 10 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेविषयी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, जिल्ह्यातील मिरचीचे उत्पन्न चांगले आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी मिरची प्रक्रिया संच उभारण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात मोसंबी पिकांचे मोठे क्षेत्र आहे, त्यामुळे मोसंबी प्रतवारी केंद्रामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होईल. असेही त्यांनी सांगितले.बैठकीत खरीप हंगामातील प्रमुख पिकांच्या महत्वाच्या किड रोग व्यवस्थापन संनियंत्रण समिती, तालुकानिहाय खरीप पेरणी अहवाल, पिकावरील किड व रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प, सर्वेक्षण पिक पाहणी, कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या भांडवली गुंतवणूकीच्या योजना, कृषी समृध्दी योजनेसाठी निधी उपलब्धता व निधीचे वितरण, जिल्हास्तरावरील स्थानिक गरजा लक्षात घेवून गरजेनूसार तयार करण्यात येणाऱ्या योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म व अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत तालुकानिहाय लक्ष-साध्य अहवाल, प्रक्रिया प्रकल्प, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, प्रधानमंत्री पिक विमा योजना व पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना, कृषी समृध्दी योजना,आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत केंद्र शासन सहायित प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना पीएमएफएमई, गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेविषयी सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस संबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.