जालना, प्रतिनिधी : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने जालना जिल्ह्यातील उपचारावर असणाऱ्या 100 क्षय रुग्णांना कोरडा पोषण आहार (तांदुळ 02 किलो, गहू-02 किलो, साखर-1 किलो, हरभरा दाळ-1 किलो) समाविष्ट असणाऱ्या किटचे वाटप आज दि. 11 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.जी.एम. कुडलीकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गजानन मस्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संजय खांडेभराड, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश काकड व डॉ.पी.व्ही. नागदरवाड यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
भारत सरकारने वर्ष 2025 पर्यंत “क्षयरोग मुक्त भारत” करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याअनुषंगाने प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत “कम्युनिटी सपोर्ट टू टीबी पेशंट” हा उपक्रम संपुर्ण भारत देशामध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत उपचाराखाली असलेल्या व संमती दिलेल्या सर्व क्षय रुग्णांना सामाजिक संस्था, औद्योगिक संस्था व समाजातील दानशुर व्यक्ती यांनी “निक्षय मित्र” म्हणुन नोंद करुन त्यांच्यामार्फत क्षय रुग्णांना अतिरिक्त पोपण आहार किट देण्याकरीता केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री टीबीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रातिनिधीक स्वरुपात 100 उपचारावरील क्षयरुग्णांना जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. जी. एम. कुंडलीकर जिल्हा क्षयरोग अधिकारी म्हणाले की, प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान जालना जिल्ह्यात उत्कृष्टपणे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती जालना यांनी क्षयरुग्णांना कोरडा पोषण आहार किट वाटप केल्या याबद्दल जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच उपस्थित क्षयरुग्णांना संपूर्ण उपचार घेऊन पोष्टीक आहार घेऊन स्वतःची काळजी घेण्याबाबत आवाहन केले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती जालना यांचा आदर्श घेऊन दानशुर व्यक्ती, औद्योगिक संस्था, सामाजिक संस्था यांनी “निक्षय मित्र” होऊन उपचारावरील सर्व क्षयरुग्णांना कोरडा पोषण आहार किट देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले.