प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2025-26 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे
ठाणे, प्रतिनिधी) : पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 करीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन उत्पादनावर आधारीत सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. अशी माहिती पुणे कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक यांनी दिली आहे.
रब्बी हंगाम 2025-26 गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमुग व रब्बी कांदा या अधिसूचित 6 पिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळ/ क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल.
या योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) करिता दि. 30 नोव्हेंबर,2025, गहु (बागायत), हरभरा, रब्बी कांदा या पिकाकरिता दि.15 डिसेंबर,2025 व उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग या पिकाकरिता दि.31 मार्च,2026 अशी आहे. त्यासाठीचे Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.
कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकांमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरुन देणे आवश्यक आहे. जर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर तसे त्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस आधी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी कळविणे आवश्यक आहे. जे शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत. त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल
यासाठी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, रब्बी हंगाम 2025-26 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पोर्टलवर https://pmfby.gov.in स्वत: शेतकरी यांनी अथवा बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इंन्शुरन्स ॲप व सामुहिक सेवा केंद्र Common Service Centres (CSC) यांच्या मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करावी: अधिक माहितीसाठी तात्काळ आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार/तालुका कृषि अधिकारी, जिल्हाधिकारी/जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
योजना कार्यान्वयीन यंत्रणा :समुह क्र.1 – समाविष्ट जिल्हे – अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, समुह क्र.2 – सोलापूर, जळगाव, सातारा, समुह क्र.3 – परभणी, वर्धा, नागपूर, समुह क्र.4 – जालना, गोंदिया, कोल्हापूर, समुह क्र.5 – नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, समुह क्र.6 – छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, समुह क्र.7 – वाशिम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार, समुह क्र.8 – हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, समुह क्र.9 – यवतमाळ, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी नियुक्त केलेली विमा कंपनी – भारतीय कृषि विमा कंपनी. पत्ता : मुंबई क्षेत्रिय कार्यालय, लोकचेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र- 400 059 ई-मेल : pikvima@aicofindia.com.समुह क्र.10 – समाविष्ट जिल्हे – धाराशिव, समुह क्र.11 – लातूर, समुह क्र.12 – बीड या जिल्ह्यांसाठी नियुक्त केलेली विमा कंपनी – आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शुरन्स कं. लि. पत्ता: माणिकचंद आयकॉन, 3 रा मजला, प्लॉट नं. 246, सी विंग, बंडगार्डन, पुणे- 411001
ई-मेल: ICICILOMPMFBYMH@icicilombard.com तरी रब्बी हंगाम 2025-26 मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन पुणे कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे .