जिल्ह्यात नोंदणीविना कार्यरत दिव्यांग संस्थांवर होणार कारवाई३० नोव्हेंबर पर्यंत नोंदणी अनिवार्य — जिल्हाधिकारी किशन जावळे
रायगड-अलिबाग प्रतिनिधी:- जिल्ह्यात दिव्यांग क्षेत्रात नोंदणी न करता कार्यरत असलेल्या संस्थांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार, अशा संस्थांसाठी नोंदणी करणे अत्यावश्यक असून ३० नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत दिली आहे.
दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, दिव्यांग क्षेत्रात कार्यरत सर्व संस्थांची अधिकृत नोंदणी अनिवार्य असल्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. संबंधित संस्थांनी आपला नोंदणी प्रस्ताव जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ५१ व ५२ अन्वये नोंदणी करणे बंधनकारक असून, नोंदणी न केलेल्या संस्थांवर कलम ९१ नुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कळविले आहे.जिल्हा प्रशासनाने सर्व दिव्यांग सेवा देणाऱ्या संस्थांना ३० नोव्हेंबर २०२५ पूर्वी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.