भिवंडी मध्ये हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू…
ठाणे प्रतिनिधी: राज्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत असून अपघाती मृत्यूदरही वाढल्याचं दिसून येत आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात घडल्याची बातमी माध्यमांतून समोर येते. आता, मुंबई–नाशिक महामार्गावर सोनाळे परिसरात झालेल्या भीषण अपघातात भिवंडीतील दोन ऑटो रिक्षा चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अज्ञात वेगवान वाहनाने ऑटो रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडला आहे. याप्रकरणी, पोलीस दफ्तरी अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील घुंघट नगर परिसरात राहणारे ऑटो चालक राजकुमार गुप्ता (वय 40 वर्षे) आणि महेंद्र केसरवानी (वय 39 वर्षे) हे दोघेही एकाच ऑटो रिक्षातून (MH 04 KA 3124) भिवंडी बायपासमार्गे सोनाळे दिशेने जात होते. दरम्यान, त्यांची ऑटो रिक्षा मुंबई–नाशिक महामार्गावरील सोनाळे जवळ पोहोचताच मागून आलेल्या एका अज्ञात वेगवान वाहनाने जोरदार धडक दिली. वाहनाची धडक इतकी भीषण होती की ऑटोमधील दोघे चालक रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ दोन्ही जखमींना उचलून भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नव्या रिक्षा परवान्यांना स्थगिती,वाहतूक कोंडी रोखणे, प्रदूषणाला आळा घालणे यासाठी राज्य शासनाने नव्या रिक्षा परवान्यांवर बंदी आणली आहे. याबाबत मुंबई मधील रिक्षा चालकांची समिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. बहुतांश रिक्षा चालकांनी याचे स्वागत केले आहे. तर, तरुण रिक्षा चालकांनी हे रोजगाराचे साधन असल्याने असे करू नये, अशी मागणी केली आहे. मात्र, राज्य सरकारने नव्या रिक्षांना आता परवाने देण्यावर स्थगिती दिली असून आजपासूनच हा निर्णय लागू करण्यात आला आहे.