मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई #मेट्रो लाईन २ ब (डी.एन. नगर ते मंडाले) चा पहिला टप्पा देशभक्त एन.जी. आचार्य उद्यान – डायमंड गार्डन ते मंडाले या मार्गाचे लोकार्पण तसेच पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई #मेट्रो लाईन २ ब (डी.एन. नगर ते मंडाले) चा पहिला टप्पा देशभक्त एन.जी. आचार्य उद्यान – डायमंड गार्डन ते मंडाले या मार्गाचे लोकार्पण तसेच पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन करण्यात आले.
मुंबई प्रतिनिधी
मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर बनविण्याचा संकल्प असून मल्टी-मोडल इंटिग्रेशनच्या माध्यमातून नागरिकांना अखंड आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मेट्रो 2 ब चा ५.६ किमीचा पहिला टप्पा आणि पाच स्थानके आजपासून सुरू होत असून उर्वरित दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणावर सुसंगत आणि जलद कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पामुळे पूर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण मुंबई एकमेकांशी प्रभावीपणे जोडली जाणार असून, भविष्यात बीकेसी, अंधेरी, वांद्रे आणि चेंबूरपर्यंत अखंड प्रवास सुलभ होणार आहे. विशेष म्हणजे ही मेट्रो हार्बर लाईनला जोडणारी पहिली मेट्रो ठरत असल्याने वाहतूक व्यवस्थेत नवा अध्याय सुरू होत आहे.
चेंबूर येथील देशभक्त एन.जी. आचार्य उद्यान – डायमंड गार्डन मेट्रो स्थानक येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, आमदार सना मलिक, तुकाराम काते, मंगेश कुडाळकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मेट्रो २बी ही पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मुंबईला जोडणारी महत्त्वाची लाईन असून, हार्बर लाईनवरून प्रथमच मेट्रोला थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मेट्रो १, मेट्रो ३, मेट्रो ४, पश्चिम रेल्वे, मोनोरेल आणि हार्बर लाईन यांच्यात सुसूत्र जोडणी होणार आहे. सुमारे १०,९८६ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातील पहिला टप्पा ३,२२५ कोटी रुपयांचा असून, मंडाले डेपो हा या प्रकल्पाचा कणा ठरणार आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या मेट्रो मार्गामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, इंधन बचत आणि प्रदूषण नियंत्रणालाही हातभार लागणार आहे. नागरिकांना अधिक आरामदायी, जलद आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.