vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यात ३ मे रोजी नीट (NEET) परीक्षेचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

ठाणे जिल्ह्यात ३ मे रोजी नीट (NEET) परीक्षेचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

ठाणे,दि.30(जिमाका) : राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारे (NTA) आयोजित केली जाणारी वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा अर्थात ‘नीट’ (NEET UG-2026) येत्या रविवारी, ३ मे २०२६ रोजी पार पडणार आहे.

     ठाणे जिल्ह्यातील २७ केंद्रांवर एकूण १२ हजार ८६२ विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, परीक्षेचे नियोजन पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रशासकीय यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समन्वय बैठकीत ते बोलत होते.

    या परीक्षेची वेळ दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रात प्रवेशाची प्रक्रिया सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल आणि दुपारी १:३० वाजता प्रवेशद्वार बंद केले जातील. एनटीएच्या नियमानुसार दुपारी १:३० नंतर कोणत्याही विद्यार्थ्याला केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याने विद्यार्थ्यांनी वेळेचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे. यावर्षी जिल्ह्याचे समन्वयन सिटी कोऑर्डिनेटर डॉ. दिनेश कांबळे (शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे) आणि वेदप्रकाश गौतम (केंद्रीय विद्यालय, कोलशेत) यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत पोलीस, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, महावितरण आणि महानगरपालिका अशा सर्व संबंधित विभागांनी समन्वय राखून काम करण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः परीक्षा केंद्रांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि पालकांची गर्दी होणार असल्याने वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन करावे. केंद्रांजवळ ‘नो-पार्किंग’ क्षेत्र निश्चित करून पालकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचण्यास विलंब होणार नाही.    वाढत्या तापमानाचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना पिण्याचे थंड पाणी, पालकांसाठी सावलीची बैठक व्यवस्था, प्राथमिक उपचार पेटी आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य व संबंधित विभागांना दिल्या. विद्यार्थ्यांनी उन्हाचा त्रास टाळण्यासाठी हलके व आरामदायी कपडे परिधान करावेत आणि भरपूर पाणी पिऊन वेळेत केंद्रावर हजर राहावे, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

     परीक्षेच्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांनी कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य, मोबाईल फोन किंवा सोन्या-चांदीचे दागिने घालून येऊ नये. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लागणारे पेन केंद्रामार्फतच पुरवले जाणार असल्याने त्यांनी पेन, पेन्सिल किंवा रबर सोबत आणू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षेला बसणाऱ्या सर्व भावी डॉक्टरांना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

000000

संबंधित पोस्ट

मिरज तालुक्यात “सेवा पंधरवडा”अभियानाचा अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या हस्ते शुभारंभ- “महसूल योजना वाहिनी”स हिरवा झेंडा…

vishwatmaklokswamivarta

तुप्पा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद ७४२ सातबारा व ५१२ आठ-अ उताऱ्यांचे वाटप; ४५ जणांना संजय गांधी योजनेचा लाभ

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यशस्वीपणे राबविण्यासाठी महाराष्ट्रातील अंगणवाड्यांमध्ये दिव्यांग प्रोटोकॉल प्रशिक्षण संपन्न..

ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून ऑलिंपिक दिनाचे आयोजन

सामाजिक समता सप्ताह निमित्त मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळा संपन्न

लंडनच्या लेडी मेयर डेम ससून लँगली यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट उत्पादन क्षेत्रासोबतच ‘एज्युसिटी’ आणि ‘मेडीसिटी’ सारख्या संकल्पनांमधील संधींवर विशेष भर देण्यात येणार; मुंबई–लंडन सहकार्याला चालना