जावळी येथील शासकीय निवासी शाळेत सहाय्यक शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू
रायगड-अलिबाग,( प्रतिनिधी : सामाजिक न्याय विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या अधिपत्याखाली अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी जावळी, ता. माणगाव येथे कार्यरत शासकीय निवासी शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावर सहा महिन्यांसाठी अथवा नियमित शिक्षक रुजू होईपर्यंत ही नियुक्ती करण्यात येणार आहे.
भरती प्रक्रियेत प्राथमिक स्तरासाठी दोन जागांसाठी सहाय्यक शिक्षक पद भरले जाणार असून उमेदवारांकडे एच.एस.सी. व डी.एड. पात्रता आवश्यक आहे. तसेच माध्यमिक स्तरासाठी एका जागेसाठी (विषय हिंदी ) बी.ए., बी.एड. पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
नियुक्त उमेदवारांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंजूर केलेल्या दरानुसार घड्याळी तासांप्रमाणे मानधन देण्यात येणार असून त्याव्यतिरिक्त कोणतेही भत्ते देय राहणार नाहीत. उमेदवारांची निवड करताना अध्यापनाचा अनुभव तसेच टीईटी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता ही किमान अर्हता असून, केवळ पात्रता धारण केल्यामुळे मुलाखतीसाठी बोलावले जाईलच असे नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शासनाच्या सेवा प्रवेश नियमांनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून पदसंख्या कमी-जास्त करणे, अटी व शर्तींमध्ये बदल करणे अथवा भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याचे अधिकार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रायगड-अलिबाग यांनी राखून ठेवले आहेत.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा/रेझ्युमे तसेच आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह अर्ज अनुसूचित जाती/नवबौद्ध मुलांसाठी शासकीय निवासी शाळा, जावळी, ता. माणगाव येथे लवकरात लवकर सादर करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सुनील जाधव यांनी केले आहे.