रायगड जिल्ह्यातील ७ शासकीय वसतिगृहांमध्ये सन २०२६-२७ साठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : सामाजिक न्याय विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रायगड यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या रायगड जिल्ह्यातील सात शासकीय वसतिगृहांमध्ये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गरीब, हुशार, होतकरू तसेच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.
जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह महाड, तळा व अलिबाग येथे कार्यरत असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींची शासकीय वसतिगृहे महाड, पनवेल, अलिबाग आणि पाली-सुधागड येथे सुरू आहेत.
शासन निर्णय क्र. बी.सी.एच. २०२५/प्र.क्र./शिक्षण-२ दि. १० मार्च २०२५ नुसार प्रवेशासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून अनुसूचित जातींसाठी ८५ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के, अनुसूचित जमातींसाठी ३ टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी ५ टक्के तसेच आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी ५ टक्के आरक्षण लागू राहणार आहे.
वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी आवश्यक वह्या, पुस्तके, लेखन साहित्याकरिता ४ हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता, जिल्हा स्तरावर दरमहा १३०० रुपये व तालुका स्तरावर १००० रुपये निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे. याशिवाय गणवेश भत्ता, प्रोजेक्ट रिपोर्ट, शैक्षणिक सहल व अॅप्रन भत्त्यासारख्या सुविधा देखील उपलब्ध राहणार आहेत.
प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अनुसूचित जाती व जमातींसाठी २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी, तर विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास, अनाथ व अपंग घटकांसाठी १ लाख ५० हजार रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे.
अर्जासोबत तहसीलदार यांचा सन २०२५-२६ मधील उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, मागील इयत्तेचे गुणपत्रक, बँक खात्याची झेरॉक्स प्रत तसेच आधार कार्डची झेरॉक्स जोडणे बंधनकारक आहे.
विहित नमुन्यातील अर्ज संबंधित शासकीय वसतिगृहांमध्ये विनामूल्य उपलब्ध असून अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रायगड-अलिबाग कार्यालयाशी अथवा संबंधित गृहपालांशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सुनील जाधव यांनी केले आहे.