नियमांचे काटेकोर पालन करून बकरी ईद सण उत्साहात साजरा करावा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत निर्देश..
सांगली, प्रतिनिधी : आगामी बकरी ईद सण नियमांचे काटेकोर पालन करून उत्साहात साजरा करावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र बंधनकारक असून, जनावरांची अवैध कत्तल होणार नाही, याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे केले.
आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमिवर आयोजित प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. कृष्णा माळी, डॉ राजीव चंदनशिवे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.प्रसाद गाजरे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी प्रत्यक्षरीत्या तर जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी, जनावरांच्या संरक्षणाशी संबंधित संस्थांचे प्रतिनिधी दूरदष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, बकरी ईद सणासाठी जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल, कुर्बानी करण्यात येत असते. दि. 4 मार्च 2015 पासून महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 नुसार राज्यात गाय, वळू व बैलाची कत्तल करण्यास मनाई आहे. तसेच, राज्यात गायी, वळू व बैल यांच्या कत्तलीच्या प्रयोजनासाठी वाहतूक, निर्यात, खरेदी, विक्री तसेच गोवंशीय वर्गाचे मांस बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी तसेच, जिल्ह्यातील केवळ अधिकृत पशुवधगृहामध्ये जनावरांची तपासणी करून दाखला देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने सक्षम प्राधिकाऱ्याची नियुक्ती करावी. अधिकृत पशुवधगृहामध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करावी. बकरी ईद हा सण साजरा करताना प्राणी रक्षण कायद्यामधील तरतुदी तसेच प्राणी छळ प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत स्लॉटर हाऊस अधिनियम अंतर्गत असलेल्या तरतुदींचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. प्राण्यांच्या अवशेषांची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावून शहर, गाव स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
अनधिकृत कत्तलखान्यावर कारवाईसाठी भरारी पथके नेमावीत. गावातील अनधिकृत कत्तलखान्याची माहिती सरपंच व ग्रामसेवक यांनी द्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, बकरी ईद सणासाठी जनावरांची वाहतूक होत असताना त्यांच्याकडे प्राधिकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे स्वास्थ्य प्रमाणपत्र व वाहतूक प्रमाणपत्र असल्याची तपासणी करावी. जनावरांची वाहतूक होत असताना त्यांच्या कानात बिल्ला व प्रचलित कायदे व नियम यांचे पालन करावे. यासाठी पशुसंवर्धन विभागाने स्थानिक पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, परिवहन विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा. जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रत्येक चेक पॉईंटवर जनावरांची वाहतूक नियमाप्रमाणे होत असल्याची तपासणी करावी, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीत जनावरांची अवैध वाहतूक, कत्तल व पशुधन संरक्षण संबंधित उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली