मुस्लिम औरंगजेबाची नव्हे, आपलीच अवलाद – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* मीरा रोडमधील बकरी ईद वादावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे वक्तव्य*
मुंबई प्रतिनिधी – बुधवारी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी “भारतातील मुस्लिम हे औरंगजेबाची नव्हे, तर आपलीच अवलाद आहेत,” असे वक्तव्य करत धार्मिक भावना न भडकवण्याचे आवाहन केले.
मुस्लिम धर्मियांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबईतील काही गृहसंकुलांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी बकऱ्या आणण्यास व त्यांची कुर्बानी देण्यास भाजपने तीव्र विरोध दर्शवला होता. या वादामुळे मीरा रोड, घाटकोपर, गोरेगाव यांसारख्या भागांत मोठा तणाव निर्माण झाला होता. या संपूर्ण पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारमधील मंत्री आणि ‘रिपाई’चे (RPI-A) प्रमुख ना. रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकार परिषदेत मीरा रोड येथील वादावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ना.रामदास आठवले यांनी अत्यंत परखड मत मांडले. “मुस्लिम समाजाने जर सणासाठी बकऱ्या आणल्या असतील, तर त्याला लगेच विरोध करण्याची गरज नाही. मुघल भारतात येण्यापूर्वी येथील मुस्लिम बांधव हे हिंदूच होते. मुघल आल्यानंतर येथील हिंदूंचे धर्मांतर झाले. त्यामुळे भारतातील मुस्लिम हे काही औरंगजेबाची अवलाद नाहीत, ते आपलीच (हिंदूंची) अवलाद आहेत, अडीच हजार वर्षांपूर्वी भारतात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे सगळे लोक एकत्र राहत होते. आता राजकीय फायद्यासाठी कोणीही धार्मिक भावना भडकवू नयेत. मग ते भाजपचे लोक असोत किंवा इतर कोणी, अशा पद्धतीने कोणालाही विरोध केला जाऊ नये. असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले.