
कोरोना संसर्ग आटोक्यात आला असला तरी, पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार आहेत की नाहीत?, याची चाचपणी शहरातील शाळांनी सुरु केली.
पुना प्रतिनिधी : कोरोना संसर्ग आटोक्यात आला असला तरी, पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार आहेत की नाहीत?, याची चाचपणी शहरातील शाळांनी सुरु केली आहे. यासाठी शाळांनी पालकांकडून संमतिपत्रे मागविली आहेत. या संमतिपत्रांचा कौल पाहून, येत्या चार ऑक्टोंबरला ऑफलाइन शाळा सुरु करायची की नाही?, याबाबतचा निर्णय संबंधित शाळा पातळीवर घेतला जाणार आहे. ग्रामीण भागातील शाळांनी मात्र सरकारच्या आदेशानुसार पुरेशी खबरदारी घेत, शाळा सुरु करण्याची तयारी केली आहे. राज्यातील शाळा येत्या ४ ऑक्टोंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे सहा महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा शाळा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयानुसार शहरातील इयत्ता आठवीपासून बारावीपर्यंतचे आणि ग्रामीण भागातील पाचवीपासून बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत.
पुणे शहरात ९ मार्च २०२० ला राज्यातील पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. त्यानंतर राज्य सरकारने १६ मार्च २०२० पासून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने २४ मार्च २०२० पासून केंद्र सरकारने देशभरात लॉकडाउनची अंमलबजावणी केली. तेव्हापासून जानेवारी २०२१ पर्यंत सुमारे वर्षभर शाळा बंद होत्या. त्यानंतर जानेवारी २०२१ पासून सरकारच्या निर्णयानुसार काही भागांत माध्यमिक शाळा सुरू केल्या होत्या; परंतु मार्च २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने, पुन्हा आॅफलाइन शाळा बंद झाल्या होत्या.शहरात सातवी, ग्रामीणमध्ये चौथीपर्यंतचे वर्ग बंदचशहरातील इयत्ता सातवीपर्यंतचे तर, ग्रामीण भागातील इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग यापुढेही बंदच राहणार आहेत. हे सर्व वर्ग मागील सुमारे दीड वर्षापासून बंद आहेत. कोरोनाची पहिली लाट कमी झाल्यानंतर आणि दुसरी लाट सुरू होण्यापूर्वी केवळ आठवीपासूनचे वर्ग सुरु केले होते. याशिवाय ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्ग सुमारे दीड वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा सुरू होत आहेत.



