डोळखांब प्रकल्पांतर्गत कसारा बीट-०३ येथे राष्ट्रीय पोषण माहाचे उत्साहात उद्घाटन‘आहारातील विविधता व पुरेशा प्रथिनांचे सेवन’वर भर; पौष्टिक पाककृतींचे प्रात्यक्षिक व ‘सुदृढ बाल’ स्पर्धेचे आयोजन
शहापूर, प्रतिनिधी : “आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी” या संकल्पनेअंतर्गत सुरू असलेल्या राष्ट्रीय पोषण माह २०२६ च्या अनुषंगाने प्रकल्प डोळखांब, बीट कसारा-०३ येथे दि. ०९ सप्टेंबर, २०२६ रोजी पोषण माहाचे उद्घाटन बालविकास प्रकल्प अधिकारी दिपक साखरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावर्षीच्या पोषण माहातील “आहारातील विविधता व पुरेशा प्रथिनांचे सेवन” या प्रमुख विषयानुसार कार्यक्रमात अंगणवाडी केंद्रातून वितरित करण्यात येणाऱ्या THR (Take Home Ration) तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध कच्च्या धान्यापासून विविध पौष्टिक पाककृतींचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. स्थानिक अन्नपदार्थांचा योग्य व पौष्टिक पद्धतीने वापर करून बालकांना आवश्यक पोषक घटक व पुरेशा प्रमाणात प्रथिने कशी मिळू शकतात, याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान पोषण माह प्रतिज्ञा तसेच बालस्नेही गाव प्रतिज्ञा घेण्यात आली. बालकांचे आरोग्य, संतुलित आहार, आहारातील विविधता आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य पोषणाचे महत्त्व याबाबत श्री. दिपक साखरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शहापूरचे आहारतज्ज्ञ शंकर फुलवले तसेच NRC च्या आहारतज्ज्ञ श्रीमती कोमल राठोड उपस्थित होते. त्यांनी पौष्टिक पाककृतींचे परीक्षण व मार्गदर्शन केले तसेच ‘सुदृढ बाल’ स्पर्धेचे परीक्षक म्हणून भूमिका बजावली. स्पर्धेअंतर्गत बालकांची उंची व वजन तपासून Growth Chart नुसार वयानुसार वजन व उंचीचे मूल्यमापन करण्यात आले. उत्कृष्ट बालकांची निवड करून त्यांच्या पालकांना प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमास पर्यवेक्षिका मनिषा मुळे, स्नेहा संस्थेच्या वृषाली झेंडे, संदीप पंडित, जिल्हा परिषद शिक्षक विशे तसेच कसारा उपकेंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते. अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून पोषणविषयक जनजागृती आणि लोकसहभाग अधिक बळकट करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.