
राज्यात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू; 838 घरांचे नुकसान, 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले..
महाराष्ट्र प्रतिनिधी काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rains) पडत आहे. मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
अशात महाराष्ट्रात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा 1 जून ते 7 जुलैपर्यंतचा आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली आहे.
यापैकी गेल्या 24 तासांत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे महाराष्ट्रात 838 घरांचे नुकसान झाले असून 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
याशिवाय 125 जनावरेही पावसामुळे दगावली आहेत. पूरग्रस्तांसाठी राज्यात 35 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे किमान 130 गावे बाधित झाली असून 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही दिलासादायक बाब आहे की, आतापर्यंत या ठिकाणाहून जीवितहानी झालेली नाही. मात्र मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.



