शिर्डी येथील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ठरल्याप्रमाणे पालघर जिल्ह्यात श्री जीवदानी देवी मंदिर, विरार येथून ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला प्रारंभ!
राज्य प्रतिनिधी-
मंदिरांवरील, तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावी या मागणीसाठी दर आठवड्याला ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त एक हजारांहून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता. त्याप्रमाणे या अनुषंगाने श्री जीवदानी देवी मंदिर, विरार येथे पालघर जिल्ह्यातील पहिली ‘सामूहिक आरती’ मोठ्या उत्साहाने आणि भावपूर्ण वातावरणात मान्यवर आणि भाविकांच्या उपस्थितीत ७ जानेवारीला रात्री करण्यात आली.
विरार येथील श्री जीवदानी देवी संस्थान आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही ‘सामूहिक आरती’ करण्यात आली. या वेळी श्री जिवदानी देवी संस्थानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र मंदीर महासंघाचे राज्य संयोजक श्री. प्रदिप तेंडोलकर, श्री जिवदानी देवी संस्थानचे विश्वस्त श्री. प्रणय नेरुरकर आणि श्री. विजय जोशी, आगाशी, विरार येथील देवस्थान निधी मंडळाचे अध्यक्ष श्री. माधव म्हात्रे आणि विश्वस्त श्री. कमलेश थोपटे, वसई येथील दिवाणेश्वर महादेव मंदिराचे प्रबंधक आचार्य जगदीश शास्त्री, दिवाणमान येथील श्री हनुमान मंदीराचे विश्वस्त श्री. हेमंत पाटील, हिंदू जनजागृती समितीचे मुंबई आणि पालघर जिल्हा समन्वयक आणि महाराष्ट्र मंदीर महासंघाचे संघटक श्री.बळवंत पाठक यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
२४ आणि २५ डिसेंबरला श्री साई पालखी निवारा, निमगांव, शिर्डी येथे झालेल्या तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त महाराष्ट्रभरातून ८७५ हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते तथा मंदिर अभ्यासक सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने मंदिरे, तसेच मंदिरांच्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात दर आठवड्यातून एकदा ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करणे, काशी आणि मथुरा तीर्थत्रक्षेत्रांचा खटला जदलगती न्यायालयात चालवावा; सरकारने राज्यातील सर्व मंदिरे सरकारमुक्त करून ती भक्तांच्या स्वाधीन करावीत; मंदिरात भक्तांनी अर्पण केलेला निधी महाराष्ट्र सरकारने विकासकामांसाठी न वापरण्याची घोषणा करावी; मंदिर परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ होण्यासाठी सरकारने अधिसूचना काढावी; राज्यातील मंदिरांच्या पुजार्यांना प्रतिमाह मानधन देण्याचा निर्णय घ्यावा आदी प्रमुख मागण्या ठरावांद्वारे सरकारकडे करण्यात आल्या होत्या. या मागण्या सरकारने तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी मंदिर महासंघाचे श्री. घनवट यांनी केली आहे.श्री. सुनील घनवट,राष्ट्रीय संघटक, मंदिर महा.