जनकल्याण दहिसर एसआरए सहकारी गृह संस्थेतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात २७ जानेवारीपासून उपोषण करणार
( सुरेश गायकवाड ) याच कडून- मुंबई- दहिसर (पूर्व)एस. व्ही. रोड, शांतीनगर डोंगरी, येथील जनकल्याण दहिसर एसआरए सह. गृह संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील भ्रष्टाचाराची तात्काळ दखल घेऊन चौकशी करावी,अपात्र ठरवलेल्या झोपडीधारकांना शासन निर्णय (दिनांक १६ मे २०१८) नुसार पात्र ठरवावे व परिशिष्ट-२ मध्ये बोगस करारनाम्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते
राजेंद्र पवार यांनी २७ जानेवारी पासून मुंबईतील आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या योजनेत म्हाडा, एसआरए अधिकारी आणि विकासक यांच्यातील संगनमतामुळे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक झोपडीधारकांना अन्यायकारकपणे बेघर केले गेले असून, त्यांना आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागत आहे.
शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील भ्रष्टाचाराची तात्काळ दखल घेऊन चौकशी करावी,अपात्र ठरवलेल्या झोपडीधारकांना शासन निर्णय (दिनांक १६ मे २०१८) नुसार पात्र ठरवावे.परिशिष्ट-२ मध्ये बोगस करारनाम्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, विकासकाने बांधलेले अनधिकृत बांधकाम ताब्यात घेऊन त्यावर कारवाई करावी, दोन वेगवेगळ्या परिशिष्टांनुसार योजना राबविण्याऐवजी ती एकत्र करण्याच्या मनमानी निर्णयाची चौकशी करावी व म्हाडा आणि एसआरए अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून दिलेल्या परवानग्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राजेंद्र पवार यांनी केली आहे.
गेल्या चार-पाच वर्षांत या योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात वारंवार तक्रारी करूनही शासनाने दुर्लक्ष केले आहे. बॅनरद्वारे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही केला गेला; मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.