vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

श्री क्षेत्र चौंडी विकासाचा सर्वसमावेशक बृहत विकास आराखडा तयार करा- सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र चौंडी विकासाचा सर्वसमावेशक बृहत विकास आराखडा तयार करा- सभापती प्रा.राम शिंदे

 

अहिल्यानगर प्रतिनिधी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांचे जीवन आणि त्यांच्या कार्याचे सर्व पैलू देशवासियांना एकाच ठिकाणी पाहता व अनुभवता यावेत यासाठी श्री क्षेत्र चौंडी विकासाचा सर्वसमावेशक बृहत विकास आराखडा 10 मार्चपर्यंत तयार करण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

चौंडी येथे श्री क्षेत्र चौंडी बृहत विकास आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत प्रा.शिंदे बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर उपस्थित होते.

प्रा. राम शिंदे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन आणि कार्य हे निःस्वार्थ सेवा, प्रशासनिक कुशलता आणि धार्मिक सहिष्णुतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांचे कार्य समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठीच्या विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक घेणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने या विकासाचा सुंदर, आकर्षक व नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आराखडा तयार करावा. अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या जीवनात कृषी, व्यापार विकास, आदर्श राज्यकारभार, धार्मिक स्थळांचा विकास व संवर्धन आदी बाबींना प्राधान्य दिले. देशातील बारा ज्योतिर्लिंगाच्या जीर्णोद्धाराचे कार्यही त्यांनी केले. त्यांच्या देशभरातील कार्याचा इतिहास एकत्र करून ऐतिहासिक वारसा व आध्यात्मिक भावनेची जपणूक व्हावी, यासाठी त्याची प्रतिकात्मक स्वरूपात संग्रहालयातून मांडणी करण्यात यावी.

   चौंडी येथील विकास कामातून अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची प्रेरणा सर्वदूर पोहोचण्याबरोबरच पर्यटनाला अधिक चालना मिळून रोजगार निर्मिती होण्याच्यादृष्टीने विविध बाबींचा आराखड्यात समावेश करावा. विकासकामांसाठी चौंडी परिसरात असलेल्या शासकीय जमिनीची पाहणी, मोजणी करून त्याचा नकाशा तातडीने तयार करण्यात यावा. याठिकाणी बाराही महिने पाण्याची उपलब्धता राहील यासाठी नदी पुनरुज्जीवन व संवर्धनाचा समावेश आराखड्यात करण्यात यावा. चौंडीकडे येणारे रस्ते प्रशस्त असावेत. दरवर्षी ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनामित्त चौंडी येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षीही उत्सव साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने करण्यात येणारी विकास कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले.

 चौंडी येथील विकास कामांना गती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन आणि कार्याचा आदर्श जनतेसमोर असावा व नवीन पिढीला त्यांच्या कार्याची जाणीव व्हावी या उद्देशाने चौंडी या गावाचा विकास करण्याच्यादृष्टीने अनेक विकास कामे हाती घेण्यात आलेली आहेत. सद्यस्थितीत प्रादेशिक पर्यटन योजना व ग्रामविकास विभागाच्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे या दोन योजनांतर्गत मौजे चौंडी, ता. जामखेड. जि. अहिल्यानगर येथे एकुण रु. २४ कोटी ११ लक्ष रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.

 प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत ९ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. यापैकी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मगाव चौंडी येथील गढीचे नूतनीकरण करणे, नक्षत्र उद्यान, संरक्षण भिंत बांधणे, चौंडी येथे उद्यानातील गढी व परिसरातील शिल्प, मुख्य प्रवेशद्वार आदी कामे पूर्ण आहेत. तर संग्रहालय, सिना नदीवर पश्चिम बाजूस घाटाचे बांधकाम करणे आदी कामांना मंजुरी मिळाली आहे.

ग्रामविकास विभागाकडील मौजे चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जन्मस्थान येथे संग्रहालय बांधकाम करणे, अहिल्यादेवी होळकर जन्मस्थान नदीकाठी घाट बांधकाम व सुशोभिकरण करणे, अहिल्यादेवी होळकर जन्मस्थान येथे दोन स्वागत कमानींचे बांधकाम करणे या कामांसाठीदेखील निधी मंजूर झालेला आहे. चौंडी परिसराच्या विकासासाठी शासनातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांना गती देण्यासाठी व्यापक विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना आजच्या बैठकीत देण्यात आल्या.

***

संबंधित पोस्ट

विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत घडविण्यासाठी ‘वंदे मातरम्’चा संकल्प करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात सामूहिक ‘वंदे मातरम्’ गीताचे गायन

vishwatmaklokswamivarta

शिर्डी औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुलाचे उद्घाटन दि. २३ मे २०२६ रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार

झुडपी जंगल क्षेत्रावर घर असलेला कुणीही बेघर होऊ देणार नाही- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांचा जालना दौरा भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद बैठक

महाराष्ट्र शासनाचे १८ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय,राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव-माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

vishwatmaklokswamivarta