राष्ट्रीय खाद्यतेल अभियान;मूल्यसाखळी भागीदार होण्यासाठी इच्छुक संस्थांकडून अर्ज मागविले..
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया सन २०२५-२६ अंतर्गत सोयाबीन व भुईमुग या पिकासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवड केली आहे. या योजनेंतर्गत पिकनिहाय मुल्यासाखळी भागीदार यांच्यामार्फत संपूर्ण जिल्हा कार्यक्षेत्रात समूहामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळा इ. घटक राबवायचे आहेत. त्यासाठी इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी ,सहकारी संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
पात्रता निकष :१. कंपनी कायदा किंवा सहकारी कायद्यांतर्गत नोंदणी केलेली असावी.
२. ज्या जिल्ह्यात समूह तयार झाला आहे तेथे काम करण्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव असावा. म्हणजेच नोंदणी माहे मार्च, २०२२ पूर्वीची असावी.३. किमान २०० शेतकरी, उत्पादक कंपनी (FPC) मध्ये किंवा सहकारी संस्थेमध्ये नोंदणीकृत असावेत.४. सहकारी संस्था असल्यास संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये तेलबिया पिकांत कामकाजाबाबत नमूद असावे.५. मागील ३ वर्षातील सरासरी वार्षिक उलाढाल ९ लाख रुपयापेक्षा जास्त असावी.६. शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) मध्ये शेतकऱ्यांचा किमान ३ लाख रुपयांचा सहभाग असावा.७. शेतकरी उत्पादक कंपनी/सहकारी संस्था प्राधान्याने कमी उत्पादकता असणाऱ्या तालुक्यामध्ये कार्यरत असावी.८. सरकारकडून अनुदान प्राप्तकर्त्या शेतकरी उत्पादक संघाला प्राधान्य दिले जाईल.
शेतकरी उत्पादक संघ (FPOs) योजनेंतर्गत तयार केलेले शेतकरी उत्पादक कंपनी (FPCs), NAFED, NSC-OS इ. सार्वजनिक संस्थांकडे नोंदणीकृत तेलबियाशी संबंधित शेतकरी उत्पादक कंपनी (FPCs) यांना पात्रता निकष पूर्ततेच्या आधारे निवड केली जाईल. इच्छुक शेतकरी कंपन्या, संस्थांनी पुष्ट्यर्थ कागदपत्रांच्या आधारे अर्ज करावा व सोमवार दि.५ रोजी सकाळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले आहे.