जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते माणगाव येथे सेवा पंधरवड्याचा शुभारंभ
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- महसूल व वन विभागाच्या दि. 01 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि.17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि.02 ऑक्टोबर या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सेवा पंधरवड्याची सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते प्रशासकीय भवन माणगाव येथे शुभारंभ करण्यात आला तसेच लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, माणगाव प्रांताधिकारी संदीपान सानप, रोहा प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदलकर, सहाय्यक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, तहसिलदार दशरथ काळे, गटविकास अधिकारी शुभदा पाटील, नायब तहसिलदार विपुल ढुमे आदी प्रशासकीय अधिकारी वर्ग व नागरिक उपस्थित होते
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, जिल्ह्यात “सेवा पंधरवडा” उपक्रमांतर्गत पाणंद रस्ते, रेती, घरकुल, सनद वाटप, सेतू सुविधा केंद्र तसेच आपले सरकार सेवा केंद्र यासारखे लोकाभिमुख उपक्रम राबवून विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी “सेवा पंधरवडा” अभियान यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे
ते पुढे म्हणाले की, हे अभियान तीन टप्यांमध्ये राबविण्यात येणार असून पहिला टप्पा दि.17 सप्टेंबर 2025 ते 22 सप्टेंबर 2025, दुसरा टप्पा दि.23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2025, तिसरा टप्पा दि.28 सप्टेंबर ते दि.02 ऑक्टोबर 2025 टप्पानिहाय राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पाणंद रस्ते विषयक मोहीम राबविण्यात येणार असून पाणंद/शिवरस्त्यांना क्रमांक देण्याबाबतच्या महसूल विभागाकडील शासन निर्णय 29 ऑगस्ट 2025 ची अंमलबजावणी करणे, शिव/पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, ज्या पाणंद रस्त्यांची नोंद निस्तार पत्रक वाजिब उल अर्जामध्ये करण्यात आलेली नाही त्याची नोंद घेण्याबाबत कार्यवाही करणे, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्र घेणे. रस्ता अदालत आयोजित करून शेतरस्त्यांचे प्रचलित प्रकरणे निकाली काढणे, शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे ही कार्यवाही करायची आहे. याकरिता जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय संबंधित उप अधीक्षक, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांची बैठक घेवून अभियानाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.