कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरु करून सीसीआयच्या जाचक अटी रद्द करा –
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
जालना, (प्रतिनिधी)-कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरु करून
सीसीआयच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन आज शिवसेना
(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
यावर्षी जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. त्यामुळे
जवळपास सर्वच पिके हातची गेली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड
अडचणीत सापडला आहे. आता कापूस खरेदी केंद्र तरी वेळेवर सुरु करावे.
जेणेकरून अगोदरच अडचणीत आलेल्या शेतकर्यांना त्याचा लाभ होईल.
शेतकर्याच्या कापसाची पहिली वेचणी होऊन कापूस घरात आला आहे. मात्र जालना
जिल्ह्यात अद्यापपर्यंत सीसीआयचे एकही खरेदी केंद्र सुरू झालेले नाही.
खरेदी करिता शासनाच्या वतीने आर्द्रतेच्या टक्केवारीवरूनच कापसाची किंमत
ठरवली जाणार असेल तर हमी भाव कसा मिळणार तसेच १२ टक्क्यांपेक्षा जास्त
आर्द्रता असल्यास कापूस खरेदी केला न गेल्यास शेतकर्यांनी या कापसाचे
काय करायचे. त्यामुळे आर्दतेची ही अट रद्द करावी. शेतकर्यांच्या कापसाची
नोंदणी ‘कपास किसान’ अॅपवर नोंदणी केल्यानंतर ती पडताळणी करण्यासाठी
केंद्राला तांत्रिक दृष्ट्या अडचण निर्माण होत असल्यानेही ही अट रद्द
करण्यात यावी. तर एकरी ३ ते ६ क्विंटल पर्यंतच कापूस खरेदी करण्यात
येणार अशा अटीमुळे जर एखाद्या शेतकर्यांस एकरी १० क्विंटल कापूस झाल्यास
उर्वरित कापूस त्याला व्यापार्याकडेच नाईजाने विकावा लागणार आहे.
त्यामुळे ही अटही अट करावी. नसता सोयाबीन व मका प्रमाणेच कापसातही मोठ्या
प्रमाणावर नुकसान शेतकर्यांस सहन करावे लागणार आहे.
एकीकडे शेतकर्यांना वेगवेगळ्या आश्वासनावर झुलवत ठेवत दुसरीकडे मात्र
शासन त्यांना चांगलेच कोंडीत अडकवित असल्याचे दिसते. या सर्व बाबींकडे
जिल्हाधिकार्यांनी लक्ष देवून शेतकर्यांना दिलासा देण्याची मागणी
निवेदनाव्दारे केली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार व
लोकप्रतिनिधींनीही या बाबतीत लक्ष घालून शासनावर दबाव आणून सर्व जाचाक
अटी रद्द करण्यास भाग पाडावे, असे आवाहनही जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी
केली.