जागतिक कौशल्य आशिया स्पर्धा 2025 मध्ये भारताची दमदार कामगिरी, पहिल्याच सहभागात पटकावला आठवा क्रमांक
खेळ प्रतिनिधी-भारताने जागतिक कौशल्य आशियाई स्पर्धा 2025 (डब्ल्यू.एस.ए.सी.) मध्ये पहिल्यांदाच भाग घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात 29 देशांमधून आठवा क्रमांक मिळवत जागतिक पातळीवर मोठी छाप पाडली. आशियातील आघाडीच्या कौशल्य परिसंस्थेशी स्पर्धा करताना भारताने शिस्त, नवोपक्रम आणि जागतिक दर्जा दाखवला.हा सहभाग कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (एम.एस.डी.ई.) यांच्या नेतृत्वाखाली झाला. एन.एस.डी.सी. आणि इतर तांत्रिक भागीदारांनी प्रशिक्षण आणि तयारीची जबाबदारी सांभाळली. भारतीय टीममध्ये 23 स्पर्धक होते, ज्यांनी 21 कौशल्य स्पर्धांमध्ये भाग घेतला. या संघासोबत 21 तज्ञ मार्गदर्शनासाठी होते.
भारतीय स्पर्धकांनी पारंपरिक तसेच तंत्रज्ञान आधारित क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. भारताने 1 रौप्य पदक, 2 कांस्य पदके आणि 3 उत्कृष्टता पदकं जिंकली, ज्यातून जागतिक कौशल्य क्षेत्रात भारताचा वेगाने वाढता प्रभाव दिसून आला.या स्पर्धेत महिला स्पर्धकांनी विशेष कामगिरी केली आणि पदकतालिकेत महत्त्वाचा वाटा उचलला. त्यांनी अपारंपारिक कौशल्य क्षेत्रांमध्ये दमदार कामगिरी करत “बेस्ट इन द कंट्री” पदक मिळवलं.भारताच्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच शिक्षण राज्य मंत्री जयंत चौधरी म्हणाले :“वर्ल्डस्किल्स एशिया 2025 मधील भारताची कामगिरीवरून आपल्या तरुणांचा आत्मविश्वास, त्यांची सर्जनशीलता आणि शिस्त दिसून येते. प्रत्येक पदक आणि मिळालेला सन्मान हा मेहनत, प्रशिक्षण आणि भारताच्या वाढत्या कौशल्य पर्यावरणाची ताकद अधोरेखित करतो. आज कौशल्य म्हणजे फक्त रोजगाराचं साधन नाही, तर ते राष्ट्रनिर्मितीचं शक्तिशाली साधन आहे. सर्व विजेते आणि सहभागींना मनापासून शुभेच्छा !तुम्ही भारताचं नाव जगभरात उजळवलं.”
जागतिक कौशल्य स्पर्धांमधील भारताची सातत्याने सुधारत जाणारी कामगिरी देशभर राबवल्या जाणाऱ्या कौशल्य अभियानांचे यश दाखवते. या स्पर्धेत लाभलेल्या प्रशिक्षकांची कामगिरी, उद्योग भागीदार आणि क्षेत्रीय कौशल्य परिषद यांच्या कठोर परिश्रमांचं फलित आहे, ज्यांनी स्पर्धकांना जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी तयार केलं.